केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण

    02-May-2025
Total Views |
केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 8 हजार 800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदराचे लोकार्पण केले.


एका बाजूला अफाट संधींनी संपन्न असलेला विशाल महासागर तर दुसरीकडे निसर्गाचे मनमोहक सौंदर्य त्याच्या भव्यतेत आणखी भर घालत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले, या सर्व गोष्टींमध्ये विझिंजम खोल-पाण्यातील सागरी बंदर आता नव्या युगाच्या विकासाचे प्रतीक म्हणून उदयास आले आसल्याचे त्यांनी नमूद केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी केरळच्या जनतेचे आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.


विझिंजम खोल पाण्यातील सागरी बंदर 8 हजार 800 कोटी खर्चून विकसित करण्यात आल्याचे सांगून सागरीमालवाहतूक केंद्राची क्षमता येत्या काही वर्षांत तिप्पट होईल, त्यामुळे जगातील काही मोठी मालवाहू जहाजेही या बंदरातून सुरळितपणे ये-जा करू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताचे जहाजावरच्या 75 टक्के मालवाहतुकीचे परिचालन पूर्वी परदेशी बंदरांतून केले जात असे, परिणामी देशाला मोठ्या प्रमाणात महसूल गमवावा लागत होता, याकडे लक्ष वेधले. ही परिस्थिती आता लवकरच पालटणार असल्याने भारताचा पैसा आता भारतीयांच्या सेवेसाठीच वापरता येईल आणि पूर्वी देशाबाहेर जाणारा पैसा आता यापुढे केरळ आणि विझिंजममधील नागरिकांना नवीन आर्थिक संधी निर्माण करेल, अशी त्यांनी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.


अनेकांच्या झोप उडणार – पंतप्रधानांचा टोला


पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, इंडिया आघाडीचे मजबूत आधारस्तंभ असलेले मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि शशी थरूर यांची समारंभात उपस्थिती काही लोकांना अडचणी निर्माण करेल. काँग्रेसचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले की, आजचा कार्यक्रम अनेक लोकांची झोप उडवेल. त्यांचा इशारा स्पष्ट होता की त्यांच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकमेव डाव्या सरकारचे प्रमुख असताना, काँग्रेसचे खासदारही तिथे उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते उद्योगपती गौतम अदानी यांना लक्ष्य करत असतात, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा टोला लगावला.