वाराणसीत 125 वर-वधूंचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न

- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले कन्यादान

    02-May-2025
Total Views |
 
Mass wedding ceremony of 125 brides and grooms concluded in Varanasi
 
मुंबई: ( Mass wedding ceremony of 125 brides and grooms concluded in Varanasi ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी वाराणसी येथे आयोजित अक्षय्य कन्यादान महोत्सवात सहभागी होऊन सामाजिक समरसता आणि पारंपरिक मूल्यांचे उत्तम उदाहरण सादर केले. उच्चवर्णीय, दलित आणि मागासवर्गीय समाजांतील पार पडलेल्या 125 वर-वधूंच्या सामूहिक विवाह सोहळ्यात वडिलांच्या भूमिकेत येऊन एका जनजाती मुलीचे कन्यादान केल्याचे पाहायला मिळाले.
 
वाराणसीच्या खोजवान येथे आयोजित या भव्य समारंभात सरसंघचालकांनी पित्याच्या भूमिकेत येऊन सोनभद्रच्या जोगीडीह गावातील जनजाती मुलगी रजवंती हिचे रेणुकुट गावातील अमनशी लग्न लावून दिले. वैदिक मंत्रोच्चारांत त्यांनी सर्वप्रथम रजवंतीचे पाय धुतले, तत्पश्चात कन्यादानाचा विधी संपन्न झाला. दरम्यान, सरसंघचालकांनी मुलीला 501 रुपये भेट देऊन शुभाशीर्वाद दिले. ‘माझ्या मुलीची काळजी घे आणि तिला नेहमी आनंदी ठेव,’ असे सरसंघचालक जेव्हा अमनला म्हणाले, तेव्हा ते दृश्य पाहून उपस्थित मंडळी भारावून गेली होती.
 
लग्नानंतर, नवविवाहित दाम्पत्यांना सायकली, शिलाई मशीन, कपडे, दागिने, रोख रक्कम, मिठाई आणि इतर आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या, जेणेकरून ते स्वावलंबी आणि उत्साहाने त्यांचे नवीन जीवन सुरू करू शकतील. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेदेखील यावेळी उपस्थित होते. त्यांनीही नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिला.
 
लग्नाने कुटुंब आणि कुटुंबातून समाज घडतो
 
उपस्थित वधुवरांना संबोधत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “विवाह हा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नाही, तर दोन कुटुंबांचा आणि एकूणच समाजाचा पाया आहे. कुटुंब हे घराला लागणार्‍या विटेसमान असते, जे संस्कारांनीच मजबूत होते. त्यामुळे लग्नाने कुटुंब आणि कुटुंबातून समाज घडत असतो.” सरसंघचालकांनी संस्कृतीचे निसर्गात रूपांतर करण्याचा संदेश दिला. 
 
पूर्व उत्तर प्रदेशातील क्षेत्रीय कार्यवाह वीरेंद्र जयस्वाल यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, “कर्तव्याची भावना सामाजिक कार्यक्रमात रूपांतरित केली.” कन्यादानात सहभागी झालेल्या शहरातील प्रमुख पालकांना त्यांनी सांगितले की, “वर्षातून किमान एक किंवा दोनदा वधुवरांना भेटावे. कुटुंबात फक्त पती, पत्नी आणि मूल अशी भावना ठेवू नये. यामुळे कुटुंब आणि समाज मागे राहतो. स्वतःला कुटुंबाचा अविभाज्य भाग मानून काम करावे,” असे आवाहन सरसंघचालक यांनी केले.