“भारतामध्ये चित्रपटगृहांची टंचाई” आमिर खान यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “फक्त २ टक्के लोकांपर्यंत पोहोचतो सिनेमा”

02 May 2025 16:06:41

Cinema reaches only 2 percent of the people Aamir Khan
 
मुंबई : ( Cinema reaches only 2 percent of the people Aamir Khan ) भारतासारख्या विशाल आणि लोकवस्तीने परिपूर्ण देशात अजूनही पुरेशी चित्रपटगृहं नाहीत, ही खंत अभिनेता व निर्माता आमिर खान यांनी WAVES Summit 2025 या कार्यक्रमात व्यक्त केली. डिजिटल माध्यमांनी वेग घेतलेला असला, तरी चित्रपटगृहातील अनुभवाला पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
“मी नेहमीच हे मानत आलो आहे की आपल्या देशात चित्रपटगृहांची संख्या अत्यंत कमी आहे. सध्या भारतात सुमारे १०,००० स्क्रीन्स आहेत. तुलनेत अमेरिका, जी आपल्यापेक्षा लोकसंख्येच्या दृष्टीने एकतृतीयांश आहे, तिथे ४०,००० स्क्रीन्स आहेत. चीनमध्ये तर तब्बल ९०,००० स्क्रीन्स आहेत,” असे उदाहरण देत त्यांनी आपल्या विचारांची मांडणी केली.
 
ते पुढे म्हणाले, “या १०,००० स्क्रीन्सपैकी निम्म्या दक्षिण भारतात आहेत आणि उरलेल्या देशाच्या इतर भागांमध्ये. त्यामुळे हिंदी चित्रपटांसाठी प्रत्यक्षात केवळ ५,००० स्क्रीन्स उपलब्ध असतात. त्यामुळे कोणताही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला, तरी तो संपूर्ण देशभर व्यापक प्रमाणात पोहोचू शकत नाही.” चित्रपटाच्या यशाची मोजणी फक्त बॉक्स ऑफिस कमाईवरून न करता प्रेक्षकांच्या सहभागावरूनही व्हायला हवी, असे मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “आपल्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांनाही आजपर्यंत केवळ ३ कोटी प्रेक्षक मिळाले आहेत. ही संख्या आपल्या एकूण लोकसंख्येच्या फक्त २ टक्के आहे. म्हणजेच आपल्या ९८ टक्के लोकांपर्यंत सिनेमा पोहोचतच नाही.”
 
भारताच्या सांस्कृतिक वैविध्यात सिनेमा हा एक महत्त्वाचा घटक असून, तो अधिक प्रभावीपणे पोहोचवायचा असेल, तर देशभरात अधिक चित्रपटगृहांची गरज आहे, असे आमिर खान यांनी स्पष्टपणे सुचवले. त्यांच्या या विधानामुळे चित्रपट उद्योगातील पायाभूत सुविधांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, सरकार आणि खासगी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात लक्ष घालण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0