मंत्रोच्चार, घंटानाद, आणि भक्तांच्या जयघोषात केदारधाम दुमदुमलं! चारधाम यात्रेला सुरुवात

    02-May-2025   
Total Views |
 
Chardham Yatra 2025
 
 
Chardham Yatra 2025 : हजारो वर्षांची परंपरा, अपार श्रद्धा आणि निसर्गाच्या सान्निध्यात दिव्यत्वाची प्रचिती घडवणारी यात्रा म्हणजे चारधाम यात्रा. हिमालयाच्या कुशीत वसलेली बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही चार धामं म्हणेज भारतीयांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं प्रतीक. सनातन धर्मात चार धाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर या यात्रेची सांगता झाली होती. आणि आता पुन्हा अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर २०२५ च्या चारधाम यात्रेची सुरुवात झाली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज विधीवत पूजा करून भाविकांसाठी उघडण्यात आलेयत. मंत्रोच्चार, घंटानाद, आणि भक्तांच्या 'हर हर महादेव', 'बम बम भोले'च्या जयघोषात केदारधाम दुमदुमून गेलंय! असं म्हणतात की, आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा करावी. चारधाम यात्रेला संपूर्ण जगात सनातन धर्मात सर्वात मोठी यात्रा मानली जाते. पण तुम्हाला माहितेय का? भारतात दोन चारधाम यात्रा प्रसिद्ध आहेत. मोठे चारधाम आणि छोटे चारधाम, पण, चारधाम म्हणजे नेमकं काय? आणि या यात्रेचं आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व काय आहे? या विषयीच माहिती घेऊया...
 
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या दहशतीला झुगारून हजारो भाविक आज केदारनाथमध्ये दाखल झालेयत. सकाळी सात वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. पहलगाममथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. दहशतीच्या सावटातही भाविकांनी केदारनाथमध्ये दाखल होऊन दहशतवादाला चपराक लगावली आहे. उत्तराखंडमधील केदारधामचे दरवाजे आज म्हणजे २ मे ला सकाळी उघडण्यात आले. केदारनाथमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. मंदिर व आसपासच्या परिसरात बर्फ साठलेला असतो त्यामुळे हिवाळ्याचे काही महिने ही यात्रा बंद असते. त्यानंतर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हे मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जातं.
 
या यात्रेतील चार धामांपैकी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे ३० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता उघडण्यात आले. तसेच, बद्रीनाथ -केदारनाथ मंदिर समितीने जाहीर केल्याप्रमाणे, केदारनाथ धामचे दरवाजे २ मे रोजी सकाळी ७ वाजता भाविकांसाठी उघडण्यात आलेत आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे ४ मे रोजी उघडले जातील. यानंतर आता नोव्हेंबरपर्यंत ही मंदिरं भाविकांसाठी खुली असणार आहे. दरम्यान, मोठ्या संख्येने भाविक या चारधाम यात्रेसाठी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. भोलेनाथांची पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी गुरुवारी दुपारी केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यानिमित्त केदारनाथ मंदिर १०८ क्विटल फुलांनी सजवण्यात आले होते.
 
भारतीय हिंदू संस्कृतीत या तीर्थयात्रेला खूप मोठे महत्त्व आहे. त्यातही "चारधाम यात्रा" ही सर्वात पवित्र आणि पुण्यप्रद मानली जाते. चारधाम म्हणजे चार प्रमुख धार्मिक स्थळे, प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी या तीर्थस्थळांना भेट द्यावी, अशी श्रद्धा आहे. थोडक्यात सांगायचं तर, चारधाम म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नसून तो एक आत्मिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे, जिथे परमेश्वराच्या सान्निध्यात स्व-शोधाचा प्रवास घडतो.भारतात दोन चारधाम यात्रा प्रसिद्ध आहेत. छोटे चार धाम आणि मोठे चार धाम यात्रा. मोठे चार धाम म्हणजे बद्रीनाथ - उत्तराखंड, द्वारका - गुजरात, जगन्नाथ पुरी - ओडिशा आणि रामेश्वरम - तामिळनाडू. ही चारही धार्मिक स्थळं भारताच्या अनुक्रमे उत्तर, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण अश्या चार वेगवेगळ्या दिशांना आहेत. ही चार पवित्र स्थळे धर्म, भक्ती, मोक्ष आणि आत्मशुद्धीची प्रतिकं मानली जातात.
 
छोटी चारधाम यात्रा म्हणजे उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चार पवित्र स्थळं.चार धाम यात्रा सामान्यतः यमुनोत्रीपासून सुरू होते आणि बद्रीनाथ येथे संपते, जी पश्चिम ते पूर्व दिशेने प्रवास करते. ही यात्रा दरवर्षी यमुनोत्री येथून सुरू होते, दुसरा मुक्काम गंगोत्री, तिसरा मुक्काम केदारनाथ आहे, आणि चौथा आणि शेवटचा मुक्काम बद्रीनाथ. या चारही ठिकाणी परमात्म्यांचा वास आहे. ही चारही धाम अत्यंत पवित्र स्थाने मानली जातात. बद्रीनाथला 'विश्वाचे आठवे वैकुंठ' म्हणून ओळखले जाते, कारण येथे भगवान विष्णू सहा महिने निद्रेत आणि सहा महिने जागृत स्थितीत असतात. धार्मिक मान्यतेनुसार, हे स्थान विष्णूच्या निवासस्थानांपैकी एक आहे.केदारनाथ हे भगवान शंकराचे विश्रामस्थान असल्याचे म्हटले जाते. केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. याला अर्धज्योतिर्लिंग म्हणतात. केदारनाथमध्ये नर आणि नारायण असे दोन पर्वत आहेत. ही नर आणि नारायण ऋषींची तपोभूमी आहे, विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शिव केदारनाथमध्ये प्रकट झाले, अशी धार्मिक मान्यता आहे.
 
चार धाम यात्रा म्हणजे केवळ धार्मिक स्थळांना भेट देणे नाही, तर ती एक साधेपणाची आणि आत्म-साक्षात्काराची प्रक्रिया आहे. जरी यात्रेचा मार्ग कठीण असला तरी श्रद्धेच्या बळावर लाखो भाविक दरवर्षी इथे येतात.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\