कांदा निर्यातीला पुन्हा वेग

19 May 2025 15:36:48
export of onion in full swing

लासलगाव :भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दि. 5 मे रोजी पाकिस्तानच्या कराची बंदरावरून होणार्‍या मालवाहतुकीवर बंदी घातली. त्यानंतर कांद्याच्या निर्यातीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, दि. 6 मे रोजीपासून मुंबईहून दुबईकडे थेट जहाजसेवा सुरू झाल्याने लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये कांद्याची थेट निर्यात पुन्हा वेग घेत आहे. आतापर्यंत 350 कंटेनरद्वारे 90 हजार क्विंटल (30 हजार मेट्रिक टन) कांद्याची निर्यात झाली. त्यामुळे भारतीय कांदा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात गाजू लागला आहे.

याआधी भारतातून दुबईकडे जाणारी बहुसंख्य कांद्याची वाहतूक कराची बंदरामार्गे होत असे. त्यामुळे पाकिस्तानला या मार्गातून वाहतूक शुल्क, सेवाशुल्क आणि बाजार ताबा यांमधून मोठा आर्थिक फायदा होत होता. मात्र, भारताने दुबई मार्ग अवलंबताच पाकिस्तानला मिळणारा ‘कांदा महसूल’ थांबला असून, भारतीय कांदा व्यापार्‍यांना थेट संधी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याचे वर्चस्व वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

थेट निर्यातीने वेळ व खर्चात बचत


मुंबई ते दुबई या थेट नवीन मार्गामुळे कांद्याच्या वाहतुकीत पाच ते सहा दिवसांची बचत होते. कांद्यासारख्या नाशवंत मालासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहेे. शिवाय थेट वाहतुकीमुळेे गुणवत्ता टिकू न राहण्यास मदत होते. परिणामी दर चांगले मिळतात आणि स्पर्धा कमी होते. त्यामुळे निर्यातीसाठी जास्तीत जास्त जहाज व कंटेनर उपलब्ध करून देण्याबरोबरच कांद्याच्या निर्यातीवर अनुदान देण्याची मागणी कांदा निर्यातदारांनी केली आहे.

भारताचे कांदा साम्राज्य पुन्हा परतणार

भारतीय कांद्याचा दर, गुणवत्ता आणि वेळेवर पुरवठा या गोष्टी यापुढेही अशाच चालू राहिल्या, तर पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत हस्तगत केलेली आखाती बाजारपेठ पुन्हा भारतीय व्यापार्‍यांच्या हातात येऊ शकते. या घडामोडींमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नवसंजीवनी मिळू शकते आणि लासलगावसारख्या कृषी बाजारपेठेचे महत्त्व जागतिक पातळीवर अधिक बळकट होण्यास मदत होईल.

Powered By Sangraha 9.0