योगिक चक्र साधना लेखांक-41 (भाग-6)

19 May 2025 20:11:47
Yogic Chakra Sadhana - 41 (Part-6)

मणिपूर चक्र : त्यालाच ‘नाभी चक्र’ असेही म्हणतात. ते नाभी म्हणजे बेंबीच्या ठिकाणी आहे. जे शरीरातील अग्नीचे स्थान आहे, ज्याला ‘जठराग्नी’ म्हणतात. ज्यामुळे भूक लागणे, अन्नाचे पचन होणे, शरीरात ऊर्जा निर्माण करणे वगैरे कार्य या चक्राचा दृश्य परिणाम आहे, किंबहुना तेच म्हणजे शरीराचे पोषण करणे, हे त्याचे मुख्य कार्य आहे. येथे अग्नी तत्त्व असल्याकारणाने ‘रं’ हे बिजाक्षर आहे आणि अग्नीलाच आपले ‘शास्त्र नारायण’ संबोधत असल्याकारणाने भगवान श्रीमहाविष्णू हे पालनकर्त्याच्या रुपाने तेथे विराजमान आहेत. आपले पोटातील असंख्य आतड्यांचे असलेले वेटोळे हाच शेष व त्यावर विराजमान अग्नी रुपात शेषशायी भगवान विष्णू असे तेथे भगवान विष्णूच माता लक्ष्मीसह, जी त्यांचे पादसेवन करत आहे, अशा रुपांत मंत्रोक्त पद्धतीने ध्यान करण्याने धैर्यप्राप्ती व या चक्राच्या साधनेत योगमुद्रेत तीन नमस्कार घातल्याने शेषशायी श्रीभगवान विष्णूंचे सहा गुण यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ‘रं’ बिजाक्षराचा उच्चार तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून शिकून घ्यावा, अन्यथा चुकीच्या उच्चाराने विपरित परिणाम होतो.

पुढे शरीरात वर हृदयस्थ अनाहत चक्र आहे, ज्याचा नाद कधीही बंद होत नाही, तो अनाहत नाद, हाच ध्यानकर्त्याने षण्मुखी मुद्रा लावून ऐकायचा असतो, ज्याने चेहर्‍यावर प्रसन्न स्मित झळकत राहते, तेच जीवनचे, सृष्टीचे संगीत आहे. त्यामुळे योग साधकाला बाह्य संगीताची गरज उरत नाही. अनाहतात नादाचा संबंध असल्याकारणाने वायू तत्त्व आहे, ज्याचे बिजाक्षर ‘यं’ असे आहे. येथेही परत उच्चाराला फार महत्त्व आहे. सोबत सद्गुरूंचे अधिष्ठान असून आई दुर्गा व पंचवक्त्र शिव (ज्याचे पंचमहाभूतात्मक पाच मुखे आहेत) असा शिव (आत्मलिंग) विराजमान असून सद्गुरू प्रासादिक सिद्ध मंत्राने त्यांचे म्हणजे प्रकृती पुरुषाचे (अमृतानुभवात संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे) ध्यान केल्याने निर्भयता व शांती प्राप्त होते. मनातील आंतरिक भय (तणाव) हेच सर्व शारीरिक व मानसिक रोगांचे मूळ कारण आहे. या अनाहत चक्राचे साधनेने ते भयच नष्ट झाल्या कारणाने शरीर निरोगी व मन निर्भय अन् प्रसन्न राहते.

पुढे वर कंठात विशुद्ध चक्र विस्थापित झाले आहे. आकाश तत्त्वांशी एकरुपता असल्याकारणाने ध्वनिनिर्मिती हे महत्त्वाचे कार्य हे चक्र करत असते. इथेच संप्रेरक (हार्मोन्स) निर्मितीचे कार्य इथल्या ग्रंथी (थॉयराईड ग्लॅण्ड्स) आकाश तत्त्वाच्या पोकळीतून करत असल्याकारणाने सप्त धातूंचे पोषण करणे, शरीरातील चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवणे, प्राणशक्तीचे जतन करणे इत्यादी कार्य या चक्रातून चालते. धातूचा संबंध आल्याने शनिदेव व आकाश तत्त्व असल्याने मारुती या दोन उग्र देवता या स्थानाचे रक्षण करतात आणि त्यांनी ते करावे, म्हणून त्यांची उपासना याच केंद्रात केली जाते. तसेही पौराणिक संदर्भानुसार मारुती हा शनिवर नियंत्रण ठेवणारा देव समजतात. शनि हा ग्रह जरी असला, तरी तो विष्णू रुपात वाईट कर्माची शिक्षा देणारा देव आहे. आपण आपली कर्मे न तपासता, ‘शनि मागे लागला’ अशी बोंब ठोकत राहतो. त्याला तेवढा वेळ नाही. तुमच्या वाईट कर्माची प्रकृतीचा आधार घेऊन फळे म्हणजेच शिक्षा देणे, हे त्यांचे काम आहे. आपली कर्मसुधारणा करावी; शनि कधी मागे लागणार नाही. आपल्याच कर्मचुका असल्याने त्याची अनाहत भीती वाटणे, अपराधीपणाची भावना होऊन आत्मविश्वास कमी होणे इत्यादी मानसिक व्याधी त्यामुळे उद्भवतात. मारुती हे सप्तचिरंजीवांपैकी एक दैवत सृष्टी असेपर्यंत आहे, असे बोलले जाते. शनिउपासनेनंतर मारुतीच्या सिद्ध मंत्राचा श्रद्धापूर्वक कंठस्थ जप केल्या जातो. मारूती हा वानर रुपात शंभूचा अवतार असल्याकारणाने ‘हुंप् हुंप् हुंप्’ ध्वनि रुपात ‘हं’ हे येथील बिजाक्षर आहे. या साधनेने विरुद्ध चक्र उद्दिपित होऊन आत्मविश्वास वाढतो, शब्दात वजन येते. आपल्या वाणीच्या ध्वनीने इतर जीव सुखावतात, तुमचे ऐकावे वाटते. अशांनाच योग शास्त्रावर/अध्यात्मावर बोलण्याची सद्गुरूंनी अनुमती दिली, असे समजावे. वाणी ही शक्ती आहे. त्यासाठी वाक्शक्तीच्या मंत्र बिजाने अघोरी मुद्रा प्राणायामाचे काही (16) आवर्तने उज्जायी सह टाकणे हे विशुद्ध चक्रात स्थित वाक्शक्तीच चांगल्या रितीने उद्दिपन करते. कण्ठ हे जीवात्म्याचे वस्तिस्थान आहे. त्यामुळे ओंकाराचा उच्चारसुद्धा येथे महत्त्वाचा आहे. जो जालंधर मुद्रा प्राणायाम सोडताना तीन वेळा कंठस्थ करायचा असतो. त्यावेळी समर्पण म्हणजे ईश्वरप्रणिधानाची भावना करणे आवश्यक आहे. म्हणजे साधनेतील दोष व केलेल्या धारिष्ट्यामुळे अहंकार वाढणार नाही.
(क्रमशः)
(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)

9730014665
डॉ. गजानन जोग
Powered By Sangraha 9.0