वाढवण बंदरामुळे आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी

19 May 2025 15:24:52
Employment created because of extension of vadhvan port

नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा विकास बंदरांमुळे झाला असून जवाहरलाल नेहरू प्राधिकरण विकसित करत असलेले वाढवण बंदर भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. सुमारे 3 हजार, 600 एकर जागेत निर्माण होणारे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करणार असल्याची माहिती मुंबईच्या ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट अ‍ॅथोरिटी’चे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी दिली. गोदा घाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेचे 18 वे पुष्प गुंफताना स्व. लक्ष्मण (काका) तांबे स्मृती व्याख्यानात ‘वाढवण बंदर : एक कल्पवृक्ष’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नवलनाथ तांबे, उद्योजक रमेश पवार, शरद वाघ, अपर्णा वाघ आदि उपस्थित होते. पुढे बोलताना वाघ म्हणाले की, “शैक्षणिक स्तरावर विद्यार्थ्यांना बंदरांचा अभ्यास उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचबरोबर वाढवण बंदरामुळे भारताचा इतर देशांसोबतचा व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसेच, नाशिकपासून अवघ्या 150 किमी अंतरावर असलेले वाढवण बंदर गुजरात-मुंबईबरोबरच अनेक जवळच्या रेल्वेस्थानकांनाही खूपच जवळ आहे. येत्या दहा वर्षांमध्ये या बंदरामुळे अनेक क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती झपाट्याने होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 साल उजाडेपर्यंत जागतिक बाजारपेठेत भारताच्या अनेक क्षेत्रांचा विकास झालेला दिसेल,” असेही वाघ यांनी यावेळी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले. नवलनाथ तांबे यांनी प्रमुख वक्ते उन्मेश वाघ यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार, तर प्राचार्य प्रशांत पाटील यांनी परिचय करून दिला.

भारताच्या विकासाची नांदी

“सिंधू संस्कृतीची जी ओळख जगाला झाली, ती केवळ तेथे निर्माण करण्यात आलेल्या बंदरामुळे झाली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील मराठा आरमाराची स्थापना केली होती. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच या परकीय आक्रमकांनीदेखील बंदरांचा अत्याधुनिक विकास केल्यामुळेच ते अनेक क्षेत्रांमध्ये पुढे गेले. त्यामुळे वाढवण बंदरदेखील भारताच्या विकासाची खर्‍या अर्थाने नांदी ठरेल,” असेही वाघ म्हणाले.
Powered By Sangraha 9.0