मुंबई : संजय राऊत हे पाकिस्तानसारखेच आहेत, गुन्हे करायचे आणि व्हिक्टीम कार्ड खेळायचं, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच या पुस्तकावरून राजकारण तापले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, "संजय राऊत हे पाकिस्तानसारखेच आहेत, गुन्हे करायचे आणि व्हिक्टीम कार्ड खेळायचं. पाकिस्तानने स्वत:च अतिरेकी हल्ला केला आणि नंतर व्हिक्टीम कार्ड खेळायला लागले. त्याचपद्धतीने आता संजय राऊतांचे व्हिक्टीम कार्ड खेळणे सुरु आहे. ते काही स्वातंत्र्यसैनिक म्हणून तुरुंगात गेले नव्हते तर आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेले होते. पण ते स्वत:ला स्वातंत्र्यसैनिक म्हणून पुढे करत आहेत."
"मी तर संजय राऊतांचे पुस्तक वाचलेले नाही आणि ते विकत घेऊन वाचावे असे पुस्तक आहे असे मला वाटत नाही. राऊतांना वाटतं की, त्यांच्यावरील आरोप खोटे होते. पण ते कसे खोटे होते, त्यात काय चुकीचे होते याबद्दल एक चकार शब्दही त्यांनी पुस्तकात लिहिलेला नाही. पण नको त्या गोष्टी ज्यांचा काही संबंध नाही त्या त्यांनी लिहून ठेवल्या," अशी टीकाही त्यांनी केली.
मान ना मान मैं तेरा मेहमान!
"राऊत म्हणतात राज ठाकरे आपले जुने मित्र आहेत आणि त्यांनी फोन करायला हवा होता. पण ही कुठली जबरदस्तीची मैत्री आहे? राज ठाकरे तर कधीच संजय राऊत माझे मित्र आहेत असे म्हणत नाहीत. हेच नेहमी म्हणत असतात. मान ना मान मैं तेरा मेहमान, असं झालंय. लोकांनी आपल्याला सहानुभूती द्यावी असे राऊतांना वाटते. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर १६ हजार खोट्या केसेस टाकल्या. त्यावेळी तुम्हाला काहीही वाटले नाही का? माझ्या घरी रात्री ९ वाजता पोलिस पाठवून माझ्या ९ वर्षाच्या मुलाला प्रश्न विचारले तेव्हा लाज वाटली नाही का?" असा सवालही संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना केला आहे.