‘ऑपरेशन सिंदूर’ तर केवळ ट्रेलर, पिक्चर अभी बाकी हैं
16 May 2025 20:20:54
नवी दिल्ली, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. ते तर केवळ एक ट्रेलर होते. पाकिस्तानला यातूनही धडा न घेतल्यास संपूर्ण ‘पिक्चर’ही दाखविण्याची भारताची तयारी आहे, असा सणसणीत इशारा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला शुक्रवारी दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पराक्रम गाजविणाऱ्या भारतीय हवाईदलाच्या वायुयोद्ध्यांचे कौतुक करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे शनिवारी भुज येथील हवाईतळावर गेले होते. यावेळी ते म्हणाले,
दहशतवादाविरोधातील भारताची लढाई हा केवळ सुरक्षेचा विषय नसून, तो आता राष्ट्रीय संरक्षण सिद्धांताचा एक भाग बनला आहे. भारत दहशतावादास मुळापासून उखडून टाकण्यास सज्ज आणि सक्षम आहे. सध्याची शस्त्रसंधी म्हणजे, भारत पाकिस्तानची त्याच्या वर्तणुकीच्या आधारावर चाचणी घेत आहे. वागणूक सुधारली तर ठीक, पण त्यामध्ये कसूर झाली तर कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे तर केवळ ट्रेलर होते. आवश्यकता भासल्यास संपूर्ण ‘पिक्चर’ही दाखविण्यास भारत सज्ज आहे. दहशतवादावर हल्ला करणे आणि तो समूळ नष्ट करणे हे भारताचे ‘न्यू नॉर्मल’ आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर, याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे, तरीही पाकिस्तान, आपल्या नागरिकांकडून गोळा केलेला कर, मसूद अझर याला सुमारे 14 कोटी रुपये देण्यासाठी खर्च करणार आहे. पाकिस्तान सरकारने मुरीदके आणि बहावलपूर येथील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे, आयएमएफ ने दिलेल्या एक अब्ज डॉलरच्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी पायाभूत सुविधांना निधी पुरवण्यासाठी वापरला जाईल. आयएमएफ या आंतरराष्ट्रीय संघटनेने अप्रत्यक्षपणे केलेली ही मदतच नव्हे का, असा सवाल निर्माण होतो. पाकिस्तानला मिळणारी कोणतीही आर्थिक मदत ही दहशतवादाला वित्त पुरवठाच आहे. भारत आयएमएफला जो निधी देतो, त्याचा वापर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशात दहशतवादी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करू नये, असेही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.
भर रात्री पाकचे डोळे दिपवले
पाकिस्तानने स्वतः 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राचे सामर्थ्य मान्य केले आहे. या ‘मेड इन इंडिया’ क्षेपणास्त्राने पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाप्रमाणे प्रकाश दाखवून डोळे दिपवले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी त्यांनी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे कौतुक केले, ज्यामध्ये डीआरडीओने बनवलेल्या आकाश आणि इतर रडार प्रणालींनी अलौकिक भूमिका बजावली असल्यातेही ते म्हणाले.