पहिल्यांदाच एस. जयशंकर यांचा तालिबनच्या परराष्ट्र मंत्रीना रातोरात फोन! काय घडलं?
16 May 2025 11:45:25
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (S Jaishankar speaks with Taliban) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्याचा अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मावलवी आमिर खान मुत्ताकी यांनी निषेध व्यक्त केला. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांचे आभार मानले. भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा आरोपही अफगाणिस्तानने फेटाळून लावल्याने जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे आभार मानलेत. अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर भारतासोबत झालेली ही पहिली मंत्रिस्तरीय चर्चा होती.
मिळालेल्या वृत्तानुसार, भारत आणि अफगाणिस्तानमधील जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांचा पुनरुच्चार करत भविष्यात ते कसे पुढे नेायचे यावर दोन्ही राष्ट्रांत चर्चा झाली. तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताकडे अफगाण व्यापारी आणि रुग्णांसाठी भारतीय व्हिसा सुलभ करण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी भारतात असलेल्या अफगाण कैद्यांची सुटका करून त्यांना त्यांच्या मायदेशी परतण्याचे आवाहनही केले.
वास्तविक अफगाणिस्तानात झालेल्या तालिबानच्या प्रवेशानंतर भारताने २५ ऑगस्ट २०२१ रोजी तात्काळ व्हिसा देणे बंद केले होते. तालिबान सत्तेत आल्यानंतर तेथील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात भारत आणि तालिबान सरकारमध्ये चर्चा सुरू झाली. दुबईमध्ये विक्रम मिस्री आणि मुत्ताकी यांच्यात एक बैठक झाली. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तेव्हा अफगाणिस्तानातील लोकांशी जोडल्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय नेतृत्वाचे कौतुक केले होते.