आपली मुले आपला आरसा असतात - नंदिनी पित्रे

16 May 2025 19:41:05
Children follow what they see

डोंबिवली : आपली मुले आपला आरसा असतात. आपण स्वत:ला जसे प्रेझेंट करतो तसेच मुले वागतात. मुलांना संस्कार हे बसवून द्यावे लागत नाही. आपल्याच वागण्या, बोलण्यातून मुले शिकतात असे मत लेखिका नांदिनी पित्रे यांनी व्यक्त केले.
भारतीय स्त्री शक्ती संघटनेचा वर्धापनदिन आणि जागतिक परिवार दिनाच्या निमित्ताने डोंबिवली येथील गणेश मंदिरातील वक्रतुंड सभागृहात गुरूवारी दि. १५ मे रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हम चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक तथा सी.ए जयंत पित्रे, प्रसिध्द मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये आणि त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी पाध्ये यांची मुलाखत घेण्यात आली.

नंदिनी पित्रे पुढे म्हणाल्या, आम्हाला एकच मुलगी आहे. तिचे वडील कामानिमित्त बाहेर असल्याने तिच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. सुरूवातीला तिला पुस्तके वाचून दाखवित असे. पण तिचे वडील जो काही अर्धा तास वेळ तिला देत होते. त्या अर्धा तासात ही त्यांनी तिला शिस्त लावली. मुलींचे आता लग्न झाले आहे. त्यामुळे आता घरात आम्ही दोघांचे असतो. पती-पत्नी एकमेकांना विश्वास देतात तो महत्त्वाचा आहे. एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. एकमेकांना स्पेस देणे हा प्रत्येकाला मिळणारा क्वालिटी टाईम आहे असे ही त्यांनी सांगितले.

जयंत पित्रे म्हणाले, आमच्या नात्यात क्वालिटी टाईम वेगळा काढण्याची गरज नव्हती. आम्ही दोघे एकत्र फार कमी वेळ येतो. आपल्या रचनेप्रमाणे काम करून मग एकत्र येऊन गप्पा मारतो. तोच आमच्यासाठी क्वालिटी टाईम आहे. एकत्र कुटुंबपध्दतीत अनेक माणसं घरात असतात. त्यामुळे संवाद चालू राहतो हा एकत्र कुटुंबपध्दतीचा फायदा आहे.

अद्वैत पाध्ये म्हणाले, स्त्री आणि पुरूष हे एकमेकांना पूरक बनले आहे. कामाची विभागणी ही समानता होऊ शकत नाही. एकमेकांविषयी रिस्पेक्ट असणे महत्त्वाचे आहे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे. प्रत्येकांकडे काही गुणदोष आहेत. गुण पटकन स्वीकारले जातात. दोष नाही असे त्यांनी सांगितले.‌

डॉ. पल्लवी पाध्ये यांनी सांगितले, माझ्या कामांचे स्वरूप सकाळपासूनच सुरू होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत मुलांची जबाबदारी अद्वैत यांच्याकडूनच घेतली जाते. पण जेव्हा मुले शैक्षणिक महत्त्वाच्या टप्प्यावर होती तेव्हा मी करियरमध्ये बॅकफूटवर येत आधी मुलांकडे लक्ष दिले असे सांगितले.

या मुलाखतीमध्ये संस्थेची कार्यकर्ती डॉ. केतकी विश्वजीत भातखंडे यांनी मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली गोंधळेकर यांनी केले.
Powered By Sangraha 9.0