मुंबई : राज्य शासनाने हाती घेतलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५ महामंडळांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाचही महामंडळांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र सरकारने ने शासकीय कार्यालयांच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणण्यासाठी १०० दिवसांचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा होती. या कार्यक्रमात शासनाच्या सर्व ९५ महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केली.
दरम्यान, या १०० दिवसांच्या स्पर्धेतून निवडलेल्या राज्यातील सर्वोत्तम ५ महामंडळांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ८२.१६ गुण पटकावून पहिला क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्तम कामगिरी करणारी शासकीय कार्यालये आणि त्यांचे गुण पुढीलप्रमाणे...
१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण - ८२.१६ गुण
२) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित - ७७.१९ गुण
३) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - ७६.०२ गुण
४) महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण - ६६.३७ गुण
५) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - ६५.१४ गुण
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात महसूली विभागनिहाय सर्वोत्तम तालुका कार्यालयांचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर होईल. तर राज्यातील सर्वोत्तम विभागीय कार्यालये आणि जिल्हा कार्यालये यांच्या स्पर्धेचा निकाल २३ मे रोजी जाहीर होईल करण्यात येणार आहे.