मना संग हा सर्व संगास तोडी

    15-May-2025
Total Views |

मना संग हा सर्व संगास तोडी
 
ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. देहबुद्धी व अहंकाराचा प्रभाव मनात खोलवर असल्याने परमात्म स्वरूपाविषयी केलेला निश्चय फार काळ टिकत नाही. यासाठी सतत आध्यात्मश्रवण, सद्ग्रंथ वाचन करावे लागते. त्याने मनाचे भटकणे कमी होऊन ते निश्चयापासून ढळत नाही. हे श्रवण सज्जनसंगतीत घडले, तर आत्मज्ञान प्राप्त होऊन माणूस धन्य होतो, हे आपण मागील श्लोकात पाहिले. यापुढील श्लोकही सज्जनांच्या संगतीचे महत्त्व सांगणारा आहे.
 
मना सर्वही संग सोडूनि द्यावा।
अती आदरें सज्जनाचा धरावा।
जयाचेनि संगें महां दुःख भंगे।
जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे॥203॥
 
मानवी जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी कोणी सायकलवर, कोणी मोटारीने, तर कोणी आगगाडीने जाईल. आगगाडीने जाणारा प्रथम पोहोचेल; सायकलने जाणारा शेवटी पोहोचेल. याचा अर्थ, आपण ज्या वाहनाची संगत करतो तसा लाभ होतो. व्यसनी माणसाच्या संगतीने चांगला मनुष्य व्यसनी होऊ शकतो; विद्वानाच्या संगतीत राहिल्यास ज्ञानाची आवड निर्माण होते आणि संतांची संगत लाभली, तर आयुष्याचे कल्याण होते. यासाठी अत्यंत आदरपूर्वक सज्जनांचा संग धरावा. संतसंगतीने देहबुदी, अहंकार कमी होतात. पण गंमत अशी की समाधान बिघडवणारी, अहंकार वाढवणारी, रामाला विसरायला लावणारी संगती माणसाला प्रिय असते, असे समथार्ंचे निरीक्षण आहे. समर्थ म्हणतात,
 
जयाचेनि संगे समाधान भंंगे।
अहंता अकस्मात येऊनि लागे।
तये संगतीची जनीं कोण गोडी।
जये संगतीने मती राम सोडी॥45॥
 
स्वामी सांगतात, अशी संगती काय कामाची? ती सोडावी हेच इष्ट. सर्व संग सोडला, तरी अत्यंत आदराने सज्जनांचीच संगत धरावी. संतांचे मन निर्मळ असते, तेथे किंचितही स्वार्थ नसतो. संतांचे निःस्पृह आचरण पाहून, अनुभवून आपलेही वर्तन सुधारते. संतांच्या संगतीने आपली देहबुद्धी, अहंकार, स्वार्थ नाहीसे होतात. त्यामुळे त्यांपासून होणारे महादुःख टाळता येते आणि फार कष्ट न करता, परमात्म स्वरुपाच्या दर्शनाचा मार्ग सुलभ होतो (जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे). सज्जनाच्या संगतीने इतर अनावश्यक संगतीपासून सुटका होते. स्वामी सांगतात,
 
मना संग हा सर्व संगास तोडी।
मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी।
मना संग हा साधकां सीघ्र सोडी।
मना संग हा द्वैत निशेष मोडी॥204॥
 
देहबुद्धीतून वृथा अहंकाराचा निर्माण झालेला भ्रम संतांच्या संगतीने हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो. संसारव्यापात तसेच व्यावहारिक चिकित्सा, वासना यात अडकलेले मन निःस्पृह संतांच्या संगतीने मोकळे होऊन परमात्म स्वरूपाचा, शाश्वत आनंदाचा विचार करू लागते. संतसंग इतर संग तोडून टाकतो. मनाला शाश्वत समाधानाचा मार्ग सापडतो. अशा साधकाला मोक्ष कितीसा दूर असणार? नव्हे, त्याला तत्काळ मोक्ष प्राप्त होतो, असे स्वामी म्हणतात. परमात्म स्वरूपाशी समरस झाल्यावर द्वैत उरत नाही, द्वैत निःशेष मोडून पडते. संतसंगती अशा प्रकारे साधकाला आपलेसे करून आत्मज्ञान प्राप्त करून देते. स्वामींनी मनाच्या श्लोकांच्या पहिल्या श्लोकापासून सांगितलेला ‘राघवाचा पंथ’ येथे पूर्णत्वास पोहोचतो. द्वैत कल्पनेचा बिमोड झाल्याने साधक एकप्रकारे रामरूपात विलीन होऊन, मोक्षपदी विराजमान होतो. या श्लोकानंतरचा शेवटचा 205वा श्लोक हा फलश्रुती सांगणारा असल्याने, खर्‍या अर्थाने येथेच मनाच्या श्लोकांची सांगता होते. तथापि, यापुढील मनाच्या श्लोकांतील अखेरचा श्लोक हा फलश्रुती सांगणारा आहे, तो असा -
 
मनाची शतें ऐकतां दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आंगीं।
म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी॥205॥
 
‘दासबोध’ ग्रंथाची फलश्रुती पहिल्याच समासात आहे, पण येथे ती शेवटी सांगितली आहे, ती अर्थपूर्ण व थोडक्यात आहे. त्यात ऐहिक सुखोपभोगाची लालसा सांगितली नाही. स्वामींनी येथे प्रथम सांगून टाकले की, ही ‘मनाची शते’ ऐकल्यावर दोष नाहीसे होतात. ‘ऐकणे’ म्हणजे अर्थ समजून, अभ्यासपूर्वक श्रवण करणे, असे समर्थांना अभिप्रेत आहे. अर्थ न समजता केलेले श्रवण समर्थांना मान्य नाही. समर्थ दासबोधात म्हणतात,
 
अर्थांतर पाहिल्यावीण। उगेचि करी जो श्रवण। तो श्रोता नव्हे पाषाण। मनुष्यवेषे॥(8.6.7)
 
अशा मनुष्यरुपी पाषाणाचे श्रवण म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी! मनाच्या श्लोकांच्या अर्थाकडे ध्यान देऊन केलेल्या श्रवणाने दोष नाहीसे होतात. माणसाच्या ठिकाणी असलेले दोष स्वामींनी यापूर्वी वेळोवेळी सांगितले आहेत, त्यांची पुनरावृत्ती करीत नाही. काही माणसे देहबुद्धी व अहंकाराने स्वतःला हुशार, अक्कलवान समजतात. मीच शहाणा असा भ्रम झाल्याने ते परमार्थाची, भक्तिमार्गाची खिल्ली उडवतात, टिंगल करतात, अशांना समर्थांनी ‘मतिमंद’ म्हटले आहे. अशा मतिमंदांनी मनाचे श्लोक लक्षपूर्वक श्रवण केले, तर त्यांची वृत्ती पालटते. अहंकार, गर्व कमी होऊन ते साधना करण्यास योग्य होतात. मनाच्या श्लोकांमुळे साधकाच्या ठिकाणी ज्ञान व वैराग्य उत्पन्न होते. विकारांवर विजय मिळवल्याने साधकाच्या अंगी वेगळे सामर्थ्य येते. ज्ञानामुळे विवेक उत्पन्न होऊन, साधक कायमस्वरूपी समाधानी होतो. हे सर्व ‘चढे’ म्हणजे वाढत्या श्रेणीने प्राप्त होते. म्हणजे साधकाला चढे ज्ञान, चढे वैराग्य, चढे सामर्थ्य प्राप्त होत जाते. मानवी जीवनात आणखी काय हवे? राघवाच्या पंथावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण ठेवल्यास मुक्ती मिळते, असे रामदास स्वामी म्हणतात. मुक्ती मिळणे हे मानवी जीवनाचे ध्येय मानले आहे.
 
या लेखाबरोबरच गेली सात वर्षे गुरुवारी वाचकांच्या भेटीला येणारी ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ ही लेखमाला पूर्ण होते. या लेखमालेत एकूण 306 लेख लिहिण्याचे भाग्य दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सौजन्याने लाभले. समर्थांचे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व, प्रेरणादायी चरित्र, त्यांचे अलौकिक विचार वाचकांपर्यंत नेण्याची संधी, मला दै. ‘मुंबई तरुण भारत’ने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. दै. ‘मुंबई तरुण भारत’चा वाचकवर्ग सुविद्य व चोखंदळ आहे. समर्थांवरील लेख वाचल्यावर सुरुवातीपासूनच विविध ठिकाणांहून वाचकांनी फोन, संदेशांद्वारा प्रोत्साहनपर अभिप्राय दिले; अजूनही देत आहेत. लेख आवडल्याचे फोन, संदेश सर्व स्तरांतील वाचकांकडून आले. त्यात काही विद्याविभुषित, प्राध्यापक, समर्थवाङ्मय अभ्यासक, योगाभ्यासी यांचाही समावेश होता.
 
बोरिवलीचे एक गुजराती गृहस्थ दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वाचक होते, लेख वाचून ते फोन करत. (आता ते नाहीत) इंटरनेट, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या प्रसारमाध्यमांमुळे दै. ‘मुंबई तरुण भारत’ अनेक ठिकाणी वाचले जाते याचाही प्रत्यय आला. लेख आवडल्याचे मला आलेले काही फोन-संदेश रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, चाळीसगाव, इंदोर, पुदुच्चेरी, हरिद्वार येथील अपरिचित वाचकांकडूनही आले होते, त्या सर्वांचेच आभार. हरिद्वारचे एक संन्यासी लेख वाचल्यावर आवर्जून कळवतात. ते म्हणतात, “समर्थविचार आम्हाला मार्गदर्शक आहेत.” समर्थभक्तांचे अनेक ठिकाणांहून प्रेम मिळाले. सर्वांचे आभार. समर्थ चरित्राचे, विचारांचे अप्रतिम लेणे वाचकांपर्यंत नेण्याचे काम मी लेखणीद्वारा केले. शेवटी संत तुकाराम महाराजांच्या भाषेत एवढेच म्हणावेसे वाटते की,
 
फोडिलें भांडार धन्याचा हा माल।
मी तंव हमाल भारवाही॥
(संत तुकाराम महाराज)
 
(लेखमाला समाप्त)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121