पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत

15 May 2025 18:31:26

Minister Rajnath Singh warning
 
नवी दिल्ली: - (Minister Rajnath Singh warning ) विशेष प्रतिनिधी पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाकडे अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत, हे आता जगाने बघितले आहे. त्यामुळे पाकची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएइए) देखरेखीखाली येणे आवश्यक आहे, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जगाला दिला आहे.
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी श्रीनगरमधील बदामीबाग कॅन्ट येथे भारतीय सैन्याच्या शूर सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दहशतवादाविरुद्ध भारताचा दृढनिश्चय यावरून अंदाज लावता येतो की पाकिस्तानच्या अणुब्लॅकमेलच्या धमकीमुळे भारत विचलित झाला नाही., पाकिस्तानने भारताला अनेक वेळा अतिशय बेजबाबदारपणे अणुहल्ल्याची धमकी दिली आहे, हे जगाने पाहिले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार देशाच्या हाती अण्वस्त्रे सुरक्षित आहेत, का असा जगापुढे सवाल आहे. त्यामुळे पाकची अण्वस्त्रे आयएइएच्या देखरेखीखाली घेतली पाहिजेत, असे ते म्हणाले.
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर हे भारताने इतिहासातील दहशतवादाविरुद्ध केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचे ते उदाहरण असल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे केवळ संरक्षणच नाही तर गरज पडल्यास धाडसी निर्णय घेण्याची भारताची वचनबद्धता दर्शवते. प्रत्येक सैनिकाचे स्वप्न होते की आपण प्रत्येक दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर पोहोचून त्यांचा नाश करावा.
 
दहशतवाद्यांनी भारतीयांना त्यांच्या धर्माच्या आधारे मारले, परंतु आम्ही त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना मारले. त्यांना संपवणे हे आमचे कर्तव्य होते. आमच्या सैन्याने आपला राग बाजूला सारला आणि मोठ्या धैर्याने आणि विवेकाने पहलगामचा बदला घेतला, असेही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0