मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने मेट्रो उत्तम माध्यम - मुख्यमंत्री फडणवीस
15-May-2025
Total Views |
मुंबई: ( Metro is great make travel comfortable for Mumbaikars Chief Minister Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिरा-भाईंदर, ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) पर्यंत मेट्रोची तांत्रिक चाचणी' संपन्न झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्ग-9च्या मार्गिकेची तांत्रिक पाहणी केली व मेट्रोने प्रवास केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेट्रो मार्ग-9चा काशीगाव ते दहिसर (पूर्व) हा टप्पा या तांत्रिक चाचणीनंतर प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग रहदारीमुक्त करून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मेट्रो अत्यंत चांगले माध्यम आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून वांद्रेपर्यंत 'सिमलेस कनेक्टिव्हिटी' करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी विविध टप्प्यांवर काम सुरू आहे. या टप्प्यामध्ये एमएमआर क्षेत्रात पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज तयार करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून उड्डाणपूल आणि मेट्रो एकाच रचनेत दिसणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लवकरच विरारपर्यंत मेट्रोने प्रवास शक्य होणार आहे. विविध मेट्रो मार्गिका एकमेकांसोबत जोडल्यामुळे प्रवाशांना 'एंड टू एंड सोल्युशन' मिळेल. यासोबतच वाढवण येथे तयार होणार्या बुलेट ट्रेनच्या स्थानकासोबत मेट्रोचे 'इंटिग्रेशन' करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचेदेखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक, आ. निरंजन डावखरे तसेच मेट्रोचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.