मुंबई : बेस्टला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तिकीटाच्या दरात वाढ केली. मात्र, तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. बेस्टच्या तिकीट दरवाढीनंतर प्रवाशी संख्येत मोठी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बेस्टच्या तिकीट दरात दुपटीने वाढ करण्यात आली असून गुरुवार, ८ मेपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे द्यावे लागत आहेत. यामुळे पाच किमीसाठी ५ रुपयांना मिळणारे तिकीट आता १० रुपये, तर एसी बसचे ६ रुपयांचे तिकीट १२ रुपये इतके झाले आहे. तसेच मासिक पासमध्ये तब्बल ३५० रुपयांची वाढ होणार आहे.
दरम्यान, तिकीट दरवाढीनंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. बेस्टचे जवळपास ८ लाख प्रवासी घटले असल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे, बेस्टच्या उत्पन्नात मात्र, १ कोटींनी वाढ झाली आहे.