मुंबई: - ( Mumbai Metro 3 preferred by Mumbaikars ) मुंबई मेट्रो ३च्या २ अ 'आचार्य अत्रे चौक ते आरे जेव्हीएलआर' या मार्गाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती नुकतेच करण्यात आले. 'आम्हाला जो प्रवास करण्यासाठी पूर्वी ४५० ते ५०० रुपये आणि दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता तो प्रवास आता केवळ ६० रुपयांत आणि ३० मिनिटांत पूर्ण होतोय', अशी भावना मुंबई मेट्रो ३ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आणि राजकीय विरोधाचा सामना करत मुंबई मेट्रो३ अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' हा मुंबई महानगर क्षेत्रासाठी पूर्णपणे भूमिगत मेट्रो प्रकल्प आहे.
यापैकी आरे जेव्हीएलआर ते बीकेसीपर्यंतची मार्गिका ऑक्टोबर २०२४पासून प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर आता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक ही ९ किलोमीटरची मार्गिका शुक्रवार दि.९ रोजी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. या मार्गावर धारावी, शितळादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक ही सहा स्थानके आहेत. यातील धारावी हे स्थानक मिठी नदीखाली बांधण्यात आले आहे. त्यामुळे हे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक काम पूर्ण करत एमएमआरसीएलची ही मेट्रो आता मुंबईकरांसाठी अखेर खुली झाली. यामार्गातील 'आचार्य अत्रे चौक, वरळी ते कफ परेड' हा केवळ शेवटचा टप्पा आता बाकी आहे.
नव्याने सुरु झालेल्या वरळी ते बीकेसी या मार्गामुळे दादर, माहीम, धारावी त्याभागातील मुंबईकरांना वाहतूक कोंडी आणि गर्दीची ठिकाणं टाळून थेट पश्चिम उपनगरांकडे प्रवास करणे शक्य होते आहे. याचसोबत अंधेरी, मरोळ, सिपिज, बीकेसी याभागात कामानिमित्त जाणाऱ्या मुंबईकरांना ही उत्तम कनेक्टिव्हीटीसह प्रवासाचे साधन उपलब्ध झाले आहे. यामार्गावर कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त ६० रुपये इतका तिकीट दार आकारण्यात येतो. तर केवळ ३२ ते ३६ मिनिटांत वरळीतून थेट आरेपर्यंतच्या सुसाट प्रवासाचा अनुभवही मिळतो आहे.
"मी आचार्य अत्रे चौक, वरळी ते आरे असा प्रवास केला. अतिशय वेगात आणि केवळ ६० रुपयांत वेगवान असा प्रवास झाला. येणाऱ्या पावसाळा आणि आता उन्हाळ्यातही या मेट्रोचा प्रवास अत्यंत सुखदायक आहे. इथून अंधेरी, मरोळ याभागात रस्ते मार्गाने जायला भरपूर वेळ लागतो. मात्र हा प्रवास अत्यंत वेगवान आणि जबरदस्त आहे."
- दिनेश पोतदार, वरळी
"मी वरळी ते सिद्धिविनायक असा प्रवास केला आहे. ही मेट्रो खूप छान आणि एकदम स्वच्छ आहे. स्थानकावर एकदम स्वच्छ वॉशरूमची व्यवस्था आहेत. मेट्रोतही कुठेही गर्दी आणि गडबड नाही."
- ऋत्विक बैरी, प्रवासी
"अत्यंत कम्फर्टेबल आणि छान प्रवास आहे. परदेशात कुठेतरी आहोत अशी ही मेट्रो आहे. मी गेले पाच वर्षे मेट्रोने प्रवास करतो. आम्हाला एअरपोर्ट किंवा चकाला येथे उतरून बस किंवा रिक्षा पकडून इकडे यावे लागायचे. जो १५ मिनिटांचा रस्ता आहे खरंतर येण्यासाठी त्यासाठी ४० ते ४५ मिनिट लागत होते. आता मी टेक्नो मरोळला उतरून एमआयडीसीला नोकरीसाठी जातो. एकच स्थानकाचे अंतर आहे जे पार करायला ३५ ते ४० मिनिटे लागतात. आता केवळ १० मिनिटांत मी पोहोचतो. हा प्रवास अतिशय वेगवान आहे."
- संजय कुंभार, प्रवासी
"मी पहिल्यादाच या मेट्रोने प्रवास करते आहे. मी जर गोरेगावातून मुंबईत किंवा बीकेसीमध्ये गेले तर मला टॅक्सीने ४५० ते ५०० रुपये लागतात. मात्र केवळ ५० रुपयांत मला या मेट्रोने प्रवास करता येतो आहे."
- किरण ओसवाल, प्रवासी