कांदा हा नाशिककरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयांपैकी एक! कांदा भाव खायला लागला की पिकवणारा खूश आणि गडगडला की खाणारा खूश, असे हे खरेदीविक्रीचे चक्र सतत फिरत असते. तर या नाशिकच्या कांद्याने अनेकांच्या राजकीय नौका पैलतिरी लावल्या, तर अनेकांना असे काही भुईसपाट केले की, आजघडीला त्यांचे नामोनिशाण शिल्लक नाही. जसा पश्चिम महाराष्ट्रात उसाचा प्रश्न कायम केंद्रस्थानी असतो. अगदी तसाच उत्तर महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात नाशिकमध्ये कांदा कायम राजकारणाच्या अग्रस्थानी असतो.
याच कांदा उत्पादकांच्या जीवावर अनेकांनी आपल्या सात पिढ्यांची सोय करत उखळ पांढरे करून घेतले.कायम भावनेचे राजकारण करून शेतकर्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे कामही केले गेले. पण, एकदा का संयमाचा अंत झाला, मग कांदा उत्पादकांच्या आंदोलनाने अनेकांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. असेच एकदा तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री आणि स्वयंघोषित जाणता राजा शरद पवार यांची शेतकरी मेळाव्याच्या गोंडस नावाखाली पार पडलेल्या सभेत बागलाणच्या शेतकर्यांनी कांदे भिरकावत सभाच उधळून लावली. दोनदा कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे कांदा उत्पादकांना वार्यावर सोडण्याचे कायमच काम केले.
आता त्यांचेच पट्टशिष्य असलेले जिल्हा परिषद सदस्य ते थेट खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेणारे भास्कर भगरे यांनादेखील कांदा उत्पादकांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यास वेळ नाही. कांद्यानेच मला खासदार केल्याने देव्हार्यात कांदा घडवून बसवणार, गळ्यात सोन्याचा कांदा घालणार अशा वल्गना त्यांनी केल्या. निवडणूक काळात माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवत कांदा पट्ट्यातील शेतकर्यांची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्यासह मविआने केले. आता दर चांगलेच कोसळलेले असताना एकाही कांदा उत्पादकांचे अश्रू पुसण्यासाठी खा. भगरे त्यांच्या दारात गेल्याचे दिसत नाही. लोकसभेतही एक-दोन अपवाद वगळता कांदाप्रश्नावर ते बोलल्याचे आढळत नाही. त्यामुळे खा. भगरे यांना मतदारसंघात दिवसा कंदील हातात घेऊन शोधण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वागणुकीतून आजी खासदार भगरेंना ‘माजी’ होण्याचीच जास्त घाई झाल्याचे दिसते.
श्रद्धेला नियमांचा अडसर
उद्योगांची साथसंगत करत अजूनही शेतीकडे कल असल्याने सदाहरित असलेले नाशिक वर्षभर गारेगार असते. परिणामी, येथे पर्यटकांचाही कायम राबता असतो. त्यात नाशिकच्या पौराणिक महात्म्याला मंदिरांची जोड मिळाल्याने देश-विदेशातील भाविकही दर्शनाला नाशिकमध्ये मोठ्या संख्येने दाखल होतात. त्याअनुषंगाने शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर येथेही प्रसाद म्हणून लाडू देण्याचा निर्णय घेतला गेला. पण, या लाडू विक्रीला पुरातत्त्व विभागाने हरकत घेत, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्त्व खात्याचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले असून, मंदिराच्या परिसरातील लाडू विक्री केंद्रामुळे प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळे ‘कायदा 1958’च्या नियमाचा भंग होत असल्याचे म्हटले आहे. हे केंद्र त्वरित बंद करा, असे पत्र देवस्थानला पाठवत देवस्थानविरोधात तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले गेले. लाडू विक्री केंद्र हे पुरातत्त्व संरक्षित इमारतीच्या नियमाविरुद्ध असून ते तातडीने बंद केले नाही, तर कायद्याचे उल्लंघन मानले जाईल, असे सांगितले गेले. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर देवस्थानने मंदिरात येणार्या भाविकांना तीर्थ आणि प्रसाद नाही तर काय द्यायचे, असा सवाल उपस्थित करत मुळात जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळ कामकाज करत असल्याचे ठणकावले.
या दोघांच्या वादात पोलीस काय कारवाई करतील आणि कोणाची सरशी होईल, हे काळच ठरवेल. दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदाव्यांनंतर पुढील काळात कागदी घोडे नाचवले जातील. परंतु, देवाच्या दर्शनासाठी भाविक दूरवरून येतात. दर्शनानंतर परत जाताना आपल्या नातलगांसाठी सोबत देवाचा प्रसाद घेऊन जातात. अशा भाविकांना प्रशासनाच्या कोणत्याही निर्णयाशी काहीही देणेघेणे नसते. फक्त देवाच्या आशीर्वाद रूपाने आपल्या ओंजळीतील प्रसाद मस्तकी लावत पुण्य कमावतात. दोघांच्या भांडणात भाविकांच्या श्रद्धेकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. घेतलेला कोणताही निर्णय लोकांसाठी असला तरी लोकांच्या सोयीच्या दृष्टीने त्यात थोडाफार बदल केला तरी त्यात काही हरकत नसते, हे समजून घेण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे.