चतुरस्र भाग्यश्री

13 May 2025 11:16:46
 
Bhagyashree Desai
 
कलेच्या सर्वांगाला स्पर्श करत अभिनय, निर्मिती, चित्रकला, काव्यलेखन अशा क्षेत्रांत आपला ठसा उमटवणार्‍या भाग्यश्री देसाई यांच्याविषयी...
 
मराठी मनोरंजनसृष्टीत सोज्वळ, संवेदनशील आणि मेहनती अभिनेत्री म्हणून भाग्यश्री देसाई यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाग्यश्री देसाई या एक बहुआयामी कलाकार, निर्माती, कवयित्री, उद्योजिका आणि चित्रकार आहेत. त्यांनी ‘रसिकमोहिनी’ आणि ‘रसिकमोहिनी आर्ट्स’ या दोन संस्थांद्वारे अनेक नाटके, चित्रपट, मालिका, लघुपट यांची निर्मिती केली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी 50 पेक्षा अधिक गद्य आणि संगीत नाटकांत भूमिका साकारल्या असून, त्यांचे 2 हजार, 500 हून अधिक प्रयोग झाले आहेत. या कार्यासाठी 150 पेक्षा अधिक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. ‘चिरंजीव आईस’ आणि ‘अमेरिकन अल्बम’ ही त्यांची नाटके प्रेक्षकांमध्ये विशेष गाजली. त्यांच्या निर्मितीला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले. चित्रपट, मालिका, लघुपट आणि जाहिरातीतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, ‘होतं असं कधी कधी’, ‘राजवाडा’, ‘वाजवूया बॅण्डबाजा’ अशा चित्रपटांबरोबरच, ‘लेक लाडकी’, ‘ओढ लावी जीवा’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या. कवयित्री म्हणून त्यांनी त्रैभाषिक काव्यसंग्रह ‘आषाढ’ प्रकाशित केला असून, त्यालाही राज्य व राष्ट्रीय स्तरावर 15 हून अधिक पुरस्कार मिळाले. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांनी शाळांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी केली, मतिमंद मुलांसाठीच्या संस्थांना, वृद्धाश्रमांना मदत केली आहे.
 
महाराष्ट्रात जन्मलेल्या भाग्यश्री यांचे बालपण, एका कलात्मक आणि सुसंस्कृत वातावरणात गेले. डॉक्टर असलेल्या वडिलांचा शिस्तप्रिय स्वभाव आणि गृहिणी असलेल्या आईचे ममत्व यांचा उत्तम संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. शिक्षणाप्रिय घरात लहानाचे मोठे होत असतानाही भाग्यश्री यांना, अभिनयाची ओढ लहान वयातच लागली. कुटुंबीयांनीही त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. पुढे ‘कला’ शाखेत पदवीही मिळवली. अभिनय, संवादफेक, रंगभूमी प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा विशेष अभ्यास करत त्यांनी, आपले कौशल्य विकसित केले. यामुळेच त्यांना लवकर मालिका आणि नाटकांमध्ये भूमिका मिळू लागल्या. फक्त चेहरा नव्हे, तर विचार आणि भाषाही व्यक्तिरेखेचे जगणे ठरवते असे त्या सांगतात. ‘गाठ’, ‘देवयानी’, ‘मन उधाण वार्‍याचे’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका, प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या.
 
‘गाठ’ या क्राईम थ्रिलर मालिकेतील त्यांची संयमी भूमिका विशेष गाजली. केवळ छोट्या पडद्यापुरतेच नव्हे, तर रंगभूमी आणि सिनेमा यांमध्येही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ‘ब्लाईंड गेम’, ‘संगीत मत्स्यगंधा’, ‘संगीत ययाति-देवयानी’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘चेहरे मुखवटे’, ‘अचानक’, ‘सावर रे’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘सावित्री’ अशा नाटकांमधूनही त्यांनी कसदार अभिनय केला. मराठी चित्रपटसृष्टीतही ‘काय-बाय’, ‘राजवाडा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘वात्सल्य’, ‘जोडीदार’, ‘वाजवू या बॅण्डबाजा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या. हिंदी मालिकांमध्ये व लघुपटामध्येही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांनी चित्रकलेतही व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी साकारलेली विविध चित्रे प्रदर्शनांतही झळकली आहेत. भाग्यश्री देसाई या ‘किशोर पम्पस्’ या कंपनीच्या संचालिका असून, कवयित्री म्हणूनही एक वेगळा पैलू आहे. त्यांच्या ’आषाढ’ काव्यसंग्रहात नात्यांतील गुंतागुंत, स्त्रीमनाचे कोमल भावविश्व आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षण यांचे प्रतिबिंब रेखाटले आहे. त्यांचे ‘अमेरिकन अल्बम’ हे नाटक पिढ्यानपिढ्यां परदेशातील भारतीय कुटुंबाच्या मानसिकतेत होणारा बदल आणि त्यातून निर्माण होणार्‍या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांचा सूक्ष्मतेने वेध घेते. लेखक राजन मोहाडीकर यांच्या लेखणीतील हे नाटक ‘रसिकमोहिनी’ संस्थेने रंगमंचावर आणले असून, त्याचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले आहे. नाटकात कानेटकर कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालेले असले, तरी त्यांचे भारतीय संस्कार, मुळे, मूल्य अजूनही त्यांच्या जगण्यात खोलवर रुजलेली आहेत. मात्र, पुढच्या पिढीतील ‘हनी’सारखी मुलं या संस्कारांपासून दुरावत चालली आहेत, हेच वास्तव हे नाटक अधोरेखित करते.
 
‘पुणे नाट्य निर्माता संघा’च्या त्या सात वर्षे अध्यक्ष राहिल्या, तर ‘संस्कार भारती’ पुणे शाखेच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 15 वर्षे काम पाहिले. ‘भरत नाट्य संशोधन मंदिरा’च्या नियामक मंडळावरही त्यांनी जबाबदारी निभावली. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पुणे महापालिकेचा ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कार’, ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे ‘शांता आपटे’, ‘ना.सी. फडके’, ‘यशवंत दत्त’,पुणे मराठी ग्रंथालयाचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ असे पुरस्कार मिळाले आहेत. आज भाग्यश्री देसाई हे नाव फक्त अभिनयापुरते सीमित राहिलेले नसून, त्या एक प्रतिभावान अभिनेत्री, सशक्त निर्माती, प्रगल्भ कवयित्री आणि जागरूक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपली ओळख सिद्ध केली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अनेक नवोदित कलाकारांसाठी त्या प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
 
- अतुल तांदळीकर
Powered By Sangraha 9.0