मुबंई: (virat kohli test retirement) : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवार, दि. १२ मे रोजी त्याने निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. आपल्या सोशल मीडियाटवर एका पोस्टद्वारे त्याने ही माहिती दिली आहे. यात १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
विराटने १२३ कसोटी सामने खेळले, ज्यात २१० इनिंग्समध्ये त्याने ४६.८५ रनरेटने ९ हजार २३० धावा केल्या. यात ३० शतके व ३१ अर्ध-शतके करणाऱ्या विराटची २५४ नाबाद ही सर्वात जास्त धावसंख्या राहिली. विराटच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात आस्मान दाखवले होते. भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.
भावनिक पोस्ट करत निवृत्ती...
विराट म्हणाला, ''कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाची जर्सी घालून मला १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली. मला घडवले आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे धडेसुद्धा शिकवले''
''पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणं माझ्याकरता खूप खास होत. परंतू, आता निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्याकडे जे होतं ते सर्व मी कसोटी क्रिकेटला दिलं आणि माझ्या अपेक्षेहून मला खूप जास्त परत मिळालं आहे. कृतज्ञतेने मी आज निवृत्त होत आहे.
हा खेळ मी ज्या-ज्या खेळांडूंसोबत मैदानात खेळलो ते आणि या प्रवासात मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी माझी कृतज्ञता निवृत्तीच्या निमित्ताने व्यक्त करतो'', असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या पोस्टच्या अखेरीस विराट म्हणाला, ''माझ्या कसोटी करिअरकडे मी नेहमी हसतमुखाने पाहीन.''