चक्रातील शक्ती/देवता कोणत्या?
शरीर हे यंत्र आहे, ज्याच्या व्यवस्थेला आपण ‘बॉडी मेकॅनिझम्’ म्हणूया, ज्याची रचनाच मुळी प्राकृतिक असून जी प्रकृतीकडून-परमेश्वराकडून-ईश्वराकडून झालेली आहे. प्रत्येकाच्या शरीराच्या व्यवस्थेसाठी प्रकृतीने शरीरात चक्ररचना करून ठेवली आहे. आपण मागील लेखांक-39 मध्ये मुलाधार चक्र, त्याचे कार्य, शक्ती आणि देवता (प्ररमेश्वरी शक्तीचे प्रतिनिधिक रुप बघितले.) या सर्व चक्रांची रचना शरीरधारणेसाठी उपयुक्त आहे आणि म्हणूनच त्यांचा अभ्यास करून, त्यांची साधना करून माणसाने स्वतःच्या जीवनाचा, आपल्या कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा व ‘राष्ट्र सर्वतोपरि’ म्हणून राष्ट्राचा उद्धार करून घेणे आवश्यक आहे. म्हणून स्वामी विज्ञानानंद यांनी म्हटले आहे, “दुसर्या मोठ्याकडून शक्ती मागताना आपण इतर कोण्या लहानाला देण्याची सभ्यता मला लक्षात येते, म्हणून मीही इतरांना देईन. धन न देता आले, तर माहिती तरी देईन.” ते ऋषितुल्य होते. जसे भारतीय इतिहासात अनेक ऋषी, संत आपले ज्ञान समाजाला, पुढील पिढीला देऊन गेले, तीच संकल्पना राबवत त्यांच्या सेवार्थ हा लेखप्रपंच.
वरील प्रस्तावना लक्षात ठेवून आपण शरीररचनेतील खालून वर येताना लागणार्या दुसर्या चक्राच्या शक्ती, देवता आणि कार्य बघू. शरीररचनेतील दुसर्या चक्राचे नाव आहे, स्वाधिष्ठान चक्र. म्हणजे स्व-अधिष्ठान. कोणी म्हणेल इथे ‘स्व’ आला म्हणजे अहंकार आला. पण, तेवढा अहंकार हा या जीवनाचा पाया आहे आणि पायाच नसेल तर जगाल कसे? ती प्रकृतीची रचना आहे आणि प्रकृतीला टाळून यच्चयावत जीवसमुदाय हा जगू शकत नाही. या ठिकाणी प्रकृती म्हणजे तीन गुण सत्व, रज, तम. स्वाधिष्ठान चक्राचा वर्ण आहे ‘वं बिजाक्षर’ आणि तत्त्व आहे आप (जल). जलतत्त्वाचा गुण आहे प्रवाहित होणे. हे तीन गुण घेऊन शरीरातील जलतत्त्वाच्या प्रतिनिधींच्या (वीर्य, मूत्र, रक्त, श्वेद, ओज, लाळ, अश्रू आणि मेंदूतील पाणी) रुपाने ते सर्व शरीरभर प्रवाहित होत असते. मग सत्व, रज, तम यांपैकी जो गुण ज्याचा जास्त, तसा त्याचा स्वभाव; शांत, सात्विक, तापट, रागीट. ते सर्व प्रकृतींकडून प्राप्त होणारे जे अन्न आपण खातो, त्यावर अवलंबून आहे. कारण, अन्नाचे ही तीन प्रमुख प्रकार आहेत. सात्विक, राजस आणि तामस अन्न. सध्याच्या काळात अनेक लोक तामस अन्नच जास्त ग्रहण करतात. म्हणून त्यांचे स्वभाव रागीट, तापट, निर्दयी, खुन्शी तसेच दुष्ट बनत चालले आहेत. त्याचा परिणाम समाजात खून, मार्यामार्या, बदला, भ्रष्टाचार, बलात्कार हे प्रकार वाढून गुन्ह्याचे स्तर वाढत चालले आहेत. हा गुन्ह्याचा स्तर कमी करायचा असेल, तर तामस आहार सोडून हळूहळू राजस व राजस आहाराकडून सात्विक आहाराकडे आपले मन वळवले पाहिजे. हे समाज व मन बदलण्याचे महत्त्वाचे कार्य प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. गीता त्याबाबत वारंवार सांगते,
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः।
॥श्रीमद्भगवद्गीता अध्याय-17 श्लोक-7.
अर्थ : भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस तीन प्रकारचे प्रिय असते. यामध्ये सात्विक आहार हाच सर्वात श्रेष्ठ मानला गेला आहे.
याच स्वाधिष्ठान चक्रात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षड्विकारांची मुळे असतात. म्हणून बरेच साधक हे चक्र सोडून पुढे जायला सांगतात; पण ती अर्धवट साधना ठरेल. कारण, या षड्रिपुंचे तोटे तसेच फायदेही आहे. ती प्रकृतीची रचना आहे. तिला पाठ दाखवून कसे चालेल? तर प्रत्याहार व विवेकाच्या साहाय्याने त्यापासून जीवनात लाभ करून घेऊन पुढे जायचे असते.
या स्वाधिष्ठान चक्राच्या देवता ब्रह्मा सरस्वती मानल्या असून, त्यांचे कार्यच मुळी निर्मिती असे आहे. विचारांची, वीर्याची, संपन्नतेची, प्रसन्नतेची, निर्भयतेची. ज्यामुळे चित्ताला स्वास्थ्य, शांती व आनंद वाटून ते पुढील प्रगतीसाठी तयार राहते.
(क्रमशः)
(लेखक योगोपचारतज्ज्ञ,समुपदेशक आहेत.)
डॉ. गजानन जोग