मुंबई : भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविरोधात आता भारतात कडक पावले उचलली गेली आहेत. अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांनी या कारवाईला "शरमेचे पाऊल" असे संबोधून भारतावर टीका केली होती. यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आणि या कलाकारांवर बंदीची मागणी केली. आता, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने या मुद्द्यावर अधिकृत घोषणा करत पाकिस्तानी कलाकार, निर्माते, आणि गुंतवणूकदारांवर पूर्ण बंदी लागू केली आहे.
भारतविरोधी वक्तव्यांची प्रतिक्रिया – कलाकारांवर राष्ट्रीय अस्मितेचा आघात
फवाद खान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, "ही कारवाई लाजिरवाणी असून, जखमी व मृतांच्या कुटुंबीयांना माझी शोकसंवेदना." तर माहिरा खान यांनी थेट भारताला लक्ष्य करत लिहिलं, "भारताचा युद्धप्रिय आणि द्वेषयुक्त प्रवाह अनेक वर्षांपासून चालू आहे, मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे."
या विधानांनी भारतीय प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी सोशल मीडियावर या कलाकारांच्या कामावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.
AICWA ची अधिकृत घोषणा – “राष्ट्रीय हितास सर्वोच्च मान द्या”
AICWA ने सोशल मीडियावर अधिकृत पत्रक जाहीर करत म्हटलं, "फवाद खान आणि माहिरा खान यांनी केलेली भारतविरोधी वक्तव्ये अत्यंत निंदनीय आहेत. त्यांनी भारताच्या बलिदानाचा अपमान केला आहे."
या पत्रकात तीन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या:
भारतात पाकिस्तानी कलाकार, निर्माते आणि आर्थिक गुंतवणूकदारांवर पूर्ण बंदी.
कोणताही भारतीय कलाकार पाकिस्तानी कलावंतासोबत सहकार्य करणार नाही किंवा एकाच मंचावर येणार नाही.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीने कलात्मक सहकार्यांपेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावे.
याशिवाय, संगीत कंपन्यांनी व कलाकारांनीही पाकिस्तानी कलाकारांना प्रमोट करणं थांबवावं, असे आवाहनही AICWA ने केलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूने न राहता, भारताच्या बाजूने उभं राहा."
'अबीर गुलाल' चित्रपटावरही AICWA कडून टीका
AICWA ने त्यांच्या पत्रकात ‘अबीर गुलाल’ या चित्रपटालाही लक्ष्य करत, तो "लाजिरवाणं उदाहरण" असल्याचं म्हटलं आहे, जिथे पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे राष्ट्रीय भावना दुखावल्या गेल्या आहेत.
AICWA म्हणजे काय?
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) हे एक ना-नफा तत्वावर चालणारे संस्थान असून, भारतीय सिनेक्षेत्रातील कामगार व कलाकारांच्या सुरक्षेसाठी काम करतं. ही संस्था महाराष्ट्र सरकारशी संलग्न आहे आणि वेळोवेळी सिनेसृष्टीच्या हितासाठी स्पष्ट भूमिका घेत असते.
"कला महत्त्वाची की देश?" – AICWA चा स्पष्ट सवाल
AICWA ने आपल्या पत्रकाच्या शेवटी भारतीय कलाकारांना थेट आवाहन करत म्हटलं, "तुम्हाला ठरवावं लागेल – तुमचं स्थान देशाच्या बाजूने आहे की अशा लोकांच्या बाजूने जे त्याचा अपमान करतात?"
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात राष्ट्रवादाचा झंझावात पुन्हा एकदा जाणवतो आहे. पाकिस्तानी कलाकारांच्या टीकेनंतर AICWA ने घेतलेली कठोर भूमिका ही फक्त प्रतिक्रिया नसून, देशाच्या सांस्कृतिक सिमेचे रक्षण करण्याचा प्रयत्न आहे. यापुढे भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या वावरावर बंदी असताना, बॉलीवूड आणि इतर सिनेउद्योग यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.