- पाकच्या विनंतीवरून भारताचा सैन्य कारवाई थांबवण्याचा निर्णय
- भारताचे दहशतवादाविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण कायम
- दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी सोमवारी चर्चा करणार
10-May-2025
Total Views |
नवी दिल्ली, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखविलेल्या सैन्यसामर्थ्यामुळे माघार घेऊन पाकिस्तानने अखेर भारताकडे सैन्य कारवाई थांबविण्याची विनंती केली. भारताने ही विनंती मान्य करून सैन्य कारवाई शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सोमवारी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी दुपारी १२ वाजता पुढील चर्चा करणार आहेत. त्याचवेळी सैन्यकारवाई थांबविण्याची विनंती करूनही जम्मू – काश्मीरमध्ये पाकने गोळीबार आणि ड्रोनहल्ले केल्याचेही समोर आले आहे. बीएसएफने त्यास चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाक, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके)मधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्याचप्रमाणे पाकच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लाहोरसह महत्त्वाच्या शहरांची हवाई संरक्षण यंत्रणा उध्वस्त करणे, सैन्य आस्थापनांवर आणि सैन्य विमानतळांवर अचुक स्ट्राईक करून पाकला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यात भारतास यश आले. त्यानंतर अखेर नमलेल्या पाकने भारतास विनंती करून सैन्यकारवाई थांबविण्याची मागणी केली. भारताने पाकच्या विनंतीनुसार सैन्यकारवाई थांबवली आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर याविषयी म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांनी आज (शनिवारी) गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी भारताने सर्व प्रकारच्या आणि सर्व प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. यापुढेही ती भूमिका कायम राहणार असल्याचे डॉ. जयशंकर यांनी स्पष्ट करून भारताच्या दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचा स्पष्ट इशाराही दिला आहे.
परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्री यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकारपरिषदेत भारताच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांनी आज (शनिवारी) दुपारी ३:३५ वाजता भारतीय डीजीएमओ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५ वाजता जमीन, हवेत आणि समुद्रातील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य केले आहे. या सामंजस्याच्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील, असे मिस्री यांनी नमूद केले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे शनिवारी दुपारी पाक डीजीएमओ यांच्याकडून भारताच्या डीजीएमओ यांना दूरध्वनी करण्यात आला. त्यानंतर सैन्यकारवाई थांबविण्याबाबत दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली आहे. यावेळी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. या निर्णयाविषयी भारताने कोणत्याही पूर्व आणि पश्चात अटी मान्य केलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे भारताने सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णयही कायम आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीही या निर्णयाची पुष्टी केली आहे. पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ सैन्यकारवाई थांबविण्याविषयी सहमती दर्शविली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतविरोधी कोणतीही आगळीक यापुढे ‘ॲक्ट ऑफ वॉर’ मानली जाणार
पाकच्या विनंतीवरून भारताने सैन्य कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारताविरोधात यापुढे कोणत्याही प्रकारची आगळीक केल्यास ती कृती ही ‘ॲक्ट ऑफ वॉर’ अर्थात भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही केले निर्णयाचे स्वागत
अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनीदेखील दोन्ही देशांचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी गेल्या ४८ तासात आपण चर्चा करून सहमती दर्शविल्याचे नमूद केले आहे.
भारताची संयमाद्वारे सामर्थ्यप्रदर्शन - राहुल वानखेडे, संशोधन आणि विश्लेषक, मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था, नवी दिल्ली
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेली प्रतिक्रिया ही सीमापार दहशतवादाच्या दृष्टिकोनात एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या अनेक दशकांपासून पाकपुरस्कृत दहशतवादाचा भारत सामना करत आहे. मात्र, यावेळी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकमधील केवळ दहशतवादी छावण्याच नव्हे पाकच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य करून कठोर इशारा दिला आहे. पाकने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यावर भारताने दुप्पट ताकदीने त्यास प्रत्युत्तर दिले आणि भारतात नागरिकांचे बळी गेल्याने थेट लष्करी परिणाम होतील, असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आता सैन्यकारवाई थांबविण्यावर सहमती दर्शवून भारताने आपला संयम हा शक्तीशाली असल्याचेही दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे पाकने काय करू नये, याचीही रेषा भारताने आखून दिली आहे.
पाकच्या मानेवर टांगती तलवार – अनिकेत भावठाणकर, आंतरराष्ट्रीय संबंधांचे संशोधक, युनिव्हार्सिटी ऑफ ड्यूसबर्ग-एसान, जर्मनी
ऑपरेशन सिंदूरचा मुख्य उद्देश पहलगाम दहशतवादी घडविणाऱ्यांना अद्दल घडविणे हा होता. ७ मे च्या रात्री याचा उद्देश बऱ्यापैकी सफल झाला. भारताने पाकिस्तानच्या पंजाब राज्यात लष्करी दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून पाकिस्तानी नेतृत्वाचे मनोबल खच्ची करण्यात यश मिळवले आहे. त्याद्वारे भारताच्या हवाई दलाचे सामर्थ्य दर्शवले. शस्त्रसंधी जाहीर होण्यापूर्वी पुढील कोणत्याही हल्ल्याला युद्ध समजले जाईल, असे सांगून पाकच्या मानेवर टांगती तलवार ठेवली आहे. पाकिस्तानच्या हवाई तळांचेही मोठे नुकसान करून भारताची लष्करी बाजू वरचढ ठरली आहे. त्याचवेळी सिंधू जलकरारही स्थगितच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दहशतवादी कृत्यापासून दूर राहण्याची जबाबदारी ही पाकवर असणार आहे.