पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध एका बहुआयामी युद्धाचा शंखनाद केला आहे. विविध स्तरांवरील अप्रत्यक्ष युद्धांच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव वाढवला जात आहे. यामुळे त्याची आर्थिक आणि लष्करी ताकद विभागली गेली आहे. सध्याचे उपाय निश्चितच महत्त्वाचे आहेत. शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारताने स्विकारला असला, तरी पकिस्तानवर सहज विश्वास ठेवता येणार नाही हेच खरे...
पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याला जवळपास 20 दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक सामान्य नागरिक विचारत आहेत की, या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नेमके युद्ध कधी सुरू होणार? त्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, प्रत्यक्षात युद्ध दि. 22 एप्रिल रोजीपासूनच सुरू झाले आहे. भारत पाकिस्तानबरोबरच्या लढ्यात केवळ पारंपरिक युद्धपद्धती न अवलंबता विविध स्तरांवर आणि अनेक प्रकारच्या युद्ध पद्धतींचा वापर करत आहे. विविध माध्यमातून हे जे युद्ध लढले जात आहे, यालाच ‘मल्टि डोमेन युद्ध’ म्हणतात.
भारताने पाकिस्तानला पहलगाममधील आगळिकीबद्दल दिलेला प्रतिसाद जलद आणि बहुआयामी होता. यामध्ये राजनैतिक, आर्थिक, लॉजिस्टिक उपाययोजना, सिंधू जलकराराला स्थिगिती, पाकिस्तानमधून आयातींवर पूर्ण बंदी आणि पाकिस्तानी जहाजांवरचे निर्बंध, अटारी जमीन सीमा क्रॉसिंग व व्यापार बंद करणे, राजनैतिक संबंध कमी करणे, राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टी आणि पाकिस्तानी ‘व्हिसा’ रद्द करणे, पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करणे, पंतप्रधान मोदी यांचे तिन्ही सैन्यदलांना कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य देणे, सैन्याची सीमेवर तैनाती, पाकिस्तानी व्यक्ती आणि माध्यमांची समाजमाध्यमांवरील खाती बंद करणे यांचा समावेश होता. यामध्ये आर्थिक, व्यापार, आंतरराष्ट्रीय स्तरावरची मुद्देगिरी, नैसर्गिक संसाधने, मानसिक, सायबर आणि इतर अशा अनेक अप्रत्यक्ष युद्धांचा समावेश आहे.
पाकिस्तानला तीन आघाड्यांवर लढण्यास भाग पाडले
भारताने पाकिस्तानला एकाचवेळी तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर लढण्यास भाग पाडले आहे. पहिली आणि सर्वांत महत्त्वाची युद्ध आघाडी म्हणजे भारत-पाकिस्तान सीमा. या सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे आणि परिस्थिती तणावपूर्ण आहे.
दुसरी आघाडी आहे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा. या भागात ‘तेहरीक-ए-तालिबान’, ‘पाकिस्तान (टीटीपी)’ आणि इतर दहशतवादी गटांकडून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला आव्हान मिळत आहे.
तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची आघाडी पाकिस्तानच्या आतील बलुचिस्तान आणि वझिरिस्तानमध्येच निर्माण झाली आहे. या प्रांतांमध्ये तेथील स्वातंत्र्य चळवळी चालवणार्यांविरुद्धच पाकिस्तानचे सैन्य लढत आहे. भारताच्या या धोरणांमुळे पाकिस्तानला एकाच वेळी अनेक ठिकाणी आपले सैन्य आणि संसाधने गुंतवून ठेवावी लागत आहेत.
पाकिस्तानमध्ये अंतर्गत हिंसाचारामुळे आतापर्यंत 17 हजार, 636 हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. यामध्ये 22 हजार, 185 सामान्य नागरिक, 9 हजार, 546 पाकिस्तानी सैनिक, 35 हजार, 977 दहशतवादी मिळून एकूण 70 हजार, 920 जण मारले गेले. 2025 सालच्या चार महिन्यांमध्येही हिंसाचार फारच वाढला आहे. याचाच अर्थ पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामुळे प्रचंड नुकसान होत आहे.
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या सैनिकांनी घाबरून आपल्या पोस्ट सोडल्या आहेत. भविष्यातील धोक्याच्या भीतीने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या अनेक सैनिकांमध्ये आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीमुळे अनेक सैनिकांनी आपल्या पोस्ट सोडल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या सीमेवरची परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली.
अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वासमोर त्यांच्या सैनिकांचे मनोबल टिकवून ठेवण्याचे आव्हान मोठे आहे. यामुळे पाकिस्तान सीमेवर अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली असून आधीच तणावाखाली असलेली पाकिस्तानी सीमा अधिकच असुरक्षित झाली आहे. याचाही भारताला नक्कीच फायदा होईल.
जागतिक शिपिंग कंपन्या आणि विमानसेवांनी पाकिस्तानकडे फिरवली पाठ...
जागतिक स्तरावर पाकिस्तान हा अतिशय असुरक्षित देश मानला जातो. भारत आणि पाकिस्तान संघर्षाचा परिणाम पाकिस्तानमधील जागतिक शिपिंग कंपन्या आणि विमानसेवेवर झाला आहे. अनेक जागतिक विमान आणि शिपिंग पाकिस्तानमध्ये जाण्याचे टाळले आहे. यामुळे पाकिस्तान एकाकी पडला असून, त्याला मोठे आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे.
कोणत्याही देशासाठी सागरी आंतरराष्ट्रीय व्यापार, हवाई वाहतूक हे अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असतात. जर या मार्गांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली, तर कंपन्या आणि गुंतवणूकदार माघारी वळतात. पहलगाममधील हल्ल्यानंतर नेमके हेच घडल्याने त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या आयात-निर्यातीवर झालेला दिसतो. पाकिस्तानातील मालाची वाहतूक थांबल्याने अनेक उद्योगधंदे ठप्प पडले असून देशात वस्तूंची कमतरता जाणवू लागली आहे.
पहलगाममधील हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या विमानतळांवर आणि हवाई क्षेत्रातही असुरक्षितता निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणी भारताचा हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता, अनेक प्रमुख विमानसेवा कंपन्यांनी पाकिस्तानमधील विमानसेवा तात्पुरती किंवा कायमस्वरूपी थांबवली. यामुळे पाकिस्तानचा जगाशी असलेला हवाई संपर्क तुटल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी पाकिस्तान एक दुर्गम ठिकाण झाले आहे.
पाकिस्तानची चिनी बनावटीची मोठी शस्त्रे, विमाने तोफा 50 टक्केसुद्धा ‘सर्व्हिसिबल’ नाहीत. म्हणून पाकिस्तानला मोठा खर्च करून नवीन शस्त्रे आयात करावी लागत आहेत. याशिवाय पाकिस्तानकडे युद्धात चार दिवस लढण्याकरिता लागणारा दारूगोळाही उपलब्ध नसल्याने दारूगोळा विकत घेणे त्यांना क्रमप्राप्त आहे. हे सगळे करण्याकरिता पाकिस्तानला कर्ज काढण्यावाचून पर्याय उरला नाही. हे कर्ज काढूनच तो चीनकडून शस्त्रे आणि दारूगोळा विकत घेत आहे.
भारतीय उपायांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम
भारताने पाकिस्तानविरोधात उचललेल्या कठोर पावलांचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने 6.4 टक्के विकासदराने प्रगती करत असल्याने भारतातील विदेशी गुंतवणूकही वाढत आहे. भारताची उत्पादन क्षेत्रातील निर्यात वाढली असून ‘जीएसटी’ संकलनातही वाढ झाली आहे. याउलट, पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मंदावत चालली आहे, विकासदर घटला आहे आणि महागाईने उच्चांक गाठला आहे.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा अधिकच नकारात्मक झाली आहे. याचा थेट परिणाम पाकिस्तानमधील गुंतवणूक आणि व्यापारावर होत असून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घटून 3.2 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांवर येणे हे गंभीर आर्थिक मंदीचे लक्षण आहे. याचा अर्थ असा आहे की, देशातील उत्पादन, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीची गती मंदावली आहे. यामागे भारताने केलेली कारवाई, अस्थिर राजकीय परिस्थिती, वाढता दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घटलेली विश्वासार्हता ही प्रमुख कारणे आहेत. पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने सामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. अन्न, ऊर्जा आणि इतर मूलभूत गरजांची पूर्ती करणे महाग झाल्याने लोकांची क्रयशक्ती घटली असून गरिबीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
थोडक्यात, भारताने उचललेल्या कठोर पावलांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या पाऊलवाटेवर अग्रेसर आहे.
भारताचे सध्याचे उपाय पुरेसे आहेत का?
‘व्हिसा’ मुदत समाप्तीनंतरही भारतात राहणार्या पाकिस्तानी नागरिकांना पकडण्याच्या प्रयत्नांमध्ये हजारो बेकायदेशीर वास्तव्य करत असलेले बांगलादेशीही पकडले गेले. भारताने पाकिस्तानवर केलेले विविध उपाय निश्चितच महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि अंतर्गत सुरक्षेवर दबावही वाढत आहे. आर्थिक युद्धामुळे पाकिस्तानी अर्थव्यवस्था कमकुवत होत असून व्यापारी युद्धामुळे निर्यातीवरदेखील परिणाम होत आहे. तर भारताच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमुळे आज जगाचे लक्ष, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे वेधले जात आहे. भारताने पाणी आणि सायबर यांसारख्या अप्रत्यक्ष मार्गांचा वापरही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केला आहे. याव्यतिरिक्त, एकाच वेळी तीन आघाड्यांवर लढण्यास भाग पाडल्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी आणि आर्थिक संसाधनांवर ताण आला आहे.
अतिरिक्त उपायांची गरज आणि पारंपरिक युद्ध
सध्याचे उपाय प्रभावी असले, तरी पाकिस्तानच्या दहशतवादी विचारसरणीला आणि त्यांच्या कारवायांना कायमस्वरूपी थांबवण्यासाठी आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दहशतवाद प्रायोजक राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करणे, ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये त्याला टाकण्यासाठी दबाव आणणे आणि पाकिस्तानला मिळणारी आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत थांबवण्यासाठी प्रयत्न करणे, हे काही अतिरिक्त उपाय असू शकतात.
सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे की, पारंपरिक युद्ध म्हणजेच पाकिस्तानी सैन्यावर थेट हल्ला कधी होणार? पारंपरिक युद्ध हा नेहमीच शेवटचा पर्याय असतो. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. याचाच अनुभव पकिस्तानने घेतल्यानंतर, नाईलाजाने दि.10 मे रोजी शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारताला दिला. भारताने तो स्विकारला असला तरीही पाकिस्तानसारख्या देशाबाबत सदैव जागरुक राहाणेच श्रेयस्कर.
(नि.) ब्रि.
हेमंत महाजन