‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी भारताने या कारवाईची महिती देताना, ह संघर्ष वाढवण्यात रस नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. मात्र, युद्धाची खुमखुमी असलेला पाकिस्तानमुळे आज संर्घष टिपेला पोहचला आहे. या सर्व काळामध्ये भारताची लष्करी ताकद, त्याचा संयम , परराष्ट्रनितीमधील परिपक्वता आणि सामर्थ्याबरोबर असलेला संयम याचेच दर्शन जगाला झाले आहे. या संघर्षाच्याकाळात भारताच्या कुटनितीचा घेतलेला आढावा...
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला, आता तीन दिवस पूर्ण झाले आहेत. यादरम्यान भारताने एका जबाबदार आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची भूमिका निभावली आहे. एकीकडे सामर्थ्यवान तरीही संयमी, कणखर तरीही संतुलित असे भारताचे धोरण म्हणजे विशेष अभ्यासाचा विषय आहे. दहशतवादाविरुद्धची कारवाई आणि स्वसंरक्षण याबरोबरीनेच, सशक्त कूटनीती हादेखील विषय येथे महत्त्वाचा ठरतो. ही भारताच्या नव्या परराष्ट्रनीतीची नांदीच म्हणावी लागेल.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारत सरकारकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदा याबद्दल खूप काही सांगून जातात, ज्याचे नेतृत्व भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, तसेच लष्करी अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी केले. या परिषदांमधून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले. पहिला मुद्दा, यापूर्वीच्या दहशतवादविरोधी कारवायांपेक्षा आताची कारवाई ही मोठी आणि व्यापक स्वरूपाची आहे. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. दुसरा मुद्दा म्हणजे हा केवळ पहलगाम हल्ल्याचा बदला नसून, गेल्या तीन दशकांमधील सततचे अत्याचार आणि सीमापार दहशतवादी कारवायांना दिलेले एक व्यापक उत्तर आहे. तिसरा मुद्दा, ही दहशतवादी तळांविरुद्धची अचूक, प्रमाणबद्ध आणि परिपक्व कारवाई असून, त्यातून पाकिस्तानी लष्कर किंवा नागरिकांना हानी पोहचवण्याचा भारताचा मानस नव्हता. तसेच, हा संघर्ष वाढवण्याचादेखील भारताचा इरादा नाही, हे सुद्धा पत्रकार परिषदांमध्ये वारंवार नमूद करण्यात आले.
‘ऑपरेशन सिंदूर’मधील प्रतिकात्मकतादेखील येथे अत्यंत महत्त्वाची आहे. पहलगाम हल्ल्यात ज्या महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले, त्याचा हिशोब चुकता करणे ही त्यामागील भूमिका होती. तसेच, सांडलेल्या कुंकवाचे चित्र हे या हल्ल्यात सांडलेल्या रक्ताचेसुद्धा प्रतीक आहे. पत्रकार परिषदेतील महिला लष्करी अधिकार्यांचे प्रतिनिधित्व हे त्या महिलांच्या भावनांना दिलेली वाट असून, त्यामधून भारताचे पुरोगामित्व आणि महिला सक्षमीकरणदेखील अधोरेखित होते. परिषदांमध्ये दिसणारा कमालीचा आत्मविश्वास, परिपक्वता आणि परराष्ट्र सचिवांचे मोजके पण प्रभावी भाष्य ही बाब लक्षणीयच.
या सुरक्षा आव्हानांच्या काळात भारतीय कूटनीती पणाला लागलेली दिसते. अत्यंत काळजीपूर्वक परंतु, समर्थ आणि सशक्त असे परराष्ट्रधोरण या काळात पाहायला मिळत आहे. एकीकडे भारताची बाजू ठामपणे मांडणे आणि दुसरीकडे पाकिस्तानचे ‘खोटे नॅरेटिव्ह’ उद्ध्वस्त करणे, असा दुहेरी उद्देश्य यामागे ठळकपणे दिसतो. दि. 22 एप्रिल रोजीच्या पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच भारताने, पूर्वलक्ष्यी राजनयिक प्रयत्न सुरू केले होते. दहशतवादाचा बळी म्हणून आपल्याकडे असलेला स्वसंरक्षणाचा अधिकार आणि त्याविरुद्धच्या कारवाईची वैधता यामध्ये अभिप्रेत होती. यासंबंधात संपूर्ण जगाला आपल्या पाठीशी उभे करण्यात भारत यशस्वी ठरला.
जगभरातील राष्ट्रप्रमुख, त्यांची परराष्ट्र मंत्रालये आणि संबंधित आस्थापनांशी सातत्यपूर्ण संवादाने यामध्ये महत्त्वाची भुमिका निभावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भारताचे विविध देशातील राजदूत हे त्यांच्या त्यांच्या पातळीवरून, भारताची बाजू इतर देशांपुढे मांडत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची संपूर्ण यंत्रणा यासाठी कार्यरत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स हे स्थायी सदस्य, तसेच इतर अनेक प्रभावशाली देश जसे जपान, इस्रायल, जर्मनी, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, हे आज दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत भारताला पाठिंबा देताना दिसत आहेत. यामागे भारतीय परराष्ट्रनीतीची एक व्यापक पार्श्वभूमी आहे.
गेल्या काही वर्षांत भारत जागतिक पटलावरील एक महत्त्वपूर्ण खेळाडू बनला आहे. यामध्ये भारताचा आर्थिक उत्कर्ष, राजकीय महत्त्व, तसेच अनेक छोट्या देशांसोबत विस्तारणारे संबंध हे घटक महत्त्वाचे आहेत. एकीकडे, पंतप्रधान मोदींनी भारताच्या ‘शेजार’ संकल्पनेचा विस्तार केलेला दिसतो, ज्यामध्ये आखाती देश, मध्य अशिया, दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिकी देशांशी विस्तारित शेजार म्हणून संबंध प्रस्थापित केले. यामुळे आपल्या ’शेजार’ धोरणातील पाकिस्तानचे अवाजवी महत्त्व संपुष्टात आले. भारताच्या परराष्ट्रनीतीमध्ये आणि जागतिक पटलावरील भूमिकेमध्ये, पाकिस्तानचे स्थान आता नगण्य राहिले आहे.
दुसरीकडे, अनेक महत्त्वाच्या इस्लामी देशांशी प्रस्थापित केलेले संबंध, छोट्या देशांना विकासकामात दिलेली मदत, ‘कोविड’ काळातला लस-पुरवठा, इतर वैद्यकीय सहकार्य आणि‘ग्लोबल साऊथ’ देशांचे नेतृत्व यामुळे आज जगात भारताची सकारात्मक प्रतिमा उभी राहिली आहे. आताही पाकिस्तानविरुद्ध संघर्ष सुरू असताना भारताची परराष्ट्रनीती सुरळीत सुरू आहे; ब्रिटनसोबतचा मुक्त व्यापारी करार हे त्याचेच द्योतक.
भारताच्या सुरक्षा आव्हानांविषयी ठाम मतप्रदर्शन आणि आपली बाजू सशक्तपणे मांडणे, हे आता भारतीय राजदूतांना अवगत झाले आहे. ‘कलम 370’ काढून टाकल्यानंतर काश्मीरातील घडामोडी, तेथील विकासकामे, शांतता आणि स्थैर्य स्थापण्याचे प्रयत्न याविषयी जगाला माहिती देणे; त्याचबरोबर पाक-व्याप्त काश्मीरमधील समस्या, तेथील मानवाधिकारांचे उल्लंघन, हे विषयही जगासमोर मांडण्यात आपली यंत्रणा यशस्वी झालेली दिसते.
सध्याच्या संघर्षातदेखील उच्च पातळीवरील सततचा संवाद महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या तीन दिवसांत भारताच्या विविध देशांतील राजदूतांनी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. तसेच या आव्हानाच्यावेळी भारताची राजकीय परिपक्वता आणि एकीही जगासमोर आली आहे, ज्यात विरोधी पक्षांनी सरकार आणि भारतीय सैन्यदलांना दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरतो. काँग्रेसचे शशी थरूर हेदेखील आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांसमोर समर्पकपणे मुलाखत देताना दिसले, ज्यातून देशाची ‘वयं पंचाधिकम् शतम्’ ही भूमिका जगासमोर आली.
याविरुद्ध, सदर संघर्षात पाकिस्तानची भूमिका मात्र विस्कळीत आणि आतताईपणाची दिसली. उच्चपदस्थांच्या वक्तव्यांमध्ये सुसूत्रता नसणे, नागरी आणि लष्करी नेतृत्वामधील मतभेद, नागरी नेतृत्वाचा लष्करावरील ताबा सुटलेला दिसणे, हे प्रामुख्याने जाणवले. अर्थात ही पाकिस्तानची जुनीच समस्या असून, त्याच्याकडून त्याहून वेगळ्या वर्तनाचा अपेक्षाच नाही. आज दहशतवादावरून पाकिस्तानची जागतिक विश्वासार्हता ढासळली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सदस्य राष्ट्रांनी पाकिस्तानला धारेवर धरून, त्याच्या ‘लष्कर-ए-तोयबा’सारख्या दहशतवादी संघटनांशी लागेबंधे असण्याविषयी प्रश्न विचारले. पाकिस्तानचा कांगावेखोरपणा आणि खोटी माहिती पसरवण्याची मोहिमदेखील वेळोवेळी उघडी पडताना दिसते आहे.
एकीकडे खोटारडेपणा करणारा आणि आर्थिक-लष्करी सामर्थ्य नसतानाही केवळ लष्करातील दहशतवादी मानसिकतेमुळे संघर्ष वाढवण्याकडे कल असलेला पाकिस्तान आणि दुसरीकडे राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी परिपक्व तरीही प्रमाणबद्ध कारवाई करणारा भारत, या दोहोंमधील फरक यातून स्पष्टपणे अधोरेखित होतो. आज भारताच्या बाजूने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इस्रायल असे देश असताना, पाकिस्तानच्या मागे ठामपणे केवळ तुर्की हा एकच देश दिसतो.
सध्याच्या संघर्षाचे परिणाम कसे आणि काय असतील, हे सध्या निश्चित सांगता येणार नाही. मात्र, यायोगे समोर आलेली भारताची समर्थ परराष्ट्रनीती ही मात्र एक विश्वासार्ह आणि आश्वस्त करणारी बाब आहे, यात शंका नाही.
डॉ. रश्मिनी कोपरकर
(लेखिका जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्राध्यापक आहेत.)