मुंबई : सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणात प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी पाकिस्तानवर घणाघात करत एक ठोस संदेश दिला आहे. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मी ईश्वर आणि अल्लाह ताऱ्याजवळ प्रार्थना करतो की बलुचिस्तान लवकरच पाकिस्तानपासून स्वतंत्र होऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनो, आणि मी स्वतः वीजा घेऊन तिथे जाऊन भेट देईन."
कुमार विश्वास यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली. "जय हिंद मित्रांनो" या शब्दांत संवादाला सुरुवात करत त्यांनी जम्मू-काश्मीरमधील बदलत्या वातावरणावर भाष्य केले. "नवीन व्यवस्थेमुळे काश्मीरमध्ये गेल्या वर्षी जवळपास २ कोटी ८० लाख भारतीयांनी प्रेम आणि शांततेचे दिवस घालवले. काश्मिरी जनतेने त्यांचे स्वागत खुले दिलाने केले," असे सांगत त्यांनी काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग ठरवत महर्षी कश्यपांच्या राजधानीचा गौरव केला.
त्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या पाखंडी वृत्तीवर निशाणा साधला. "पाकिस्तानला भारतातील शांतता आणि विकास झेपत नाही. यामुळेच त्याने पहलगाममध्ये नवविवाहित जोडप्यांवर भ्याड हल्ला केला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. काही महिलांनी जेव्हा हल्लेखोरांना सांगितले की आम्हालाही ठार करा, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आम्ही तुम्हाला जिवंत ठेवतो, जेणेकरून तुम्ही जाऊन मोदींना सांगू शकता."
कुमार विश्वास यांनी स्पष्ट केलं की नरेंद्र मोदी कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी नसून, १४० कोटी भारतीय जनतेने लोकशाही मार्गाने निवडलेले पंतप्रधान आहेत. "देशातील सर्व राजकीय पक्ष, धर्म, जाती एकत्र आले आणि लष्कराच्या पाठीशी उभे राहिले. याच एकतेच्या बळावर आम्ही पहिला हल्ला केला आहे. यात दहशतवादी मसूद अझरचा कुटुंबीयही ठार झाला आहे," असेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानला दिला लोकतंत्राचा आरसा
कुमार विश्वास यांनी पाकिस्तानातील जनतेला उद्देशून म्हटले की, "आम्ही एकत्र स्वतंत्र झालो होतो, पण आज भारत जागतिक चौथ्या क्रमांकाची अर्थशक्ती बनला आहे आणि तुम्ही अजूनही आट्याच्या रांगेत आहात." त्यांनी पुढे सांगितले की, "भारताची लोकशाही टिकवली गेली, आमच्या लष्कराने कधी राजकारणात हस्तक्षेप केला नाही, आणि आमच्या लष्कराला पूर्ण आदर दिला जातो. आम्ही पेंटॅगन किंवा चीनच्या चापलुसीत अडकलेली नेतृत्वं घडवत नाही."
पाक जनतेला लष्करविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन
"हा तुमच्यासाठी संधीचा क्षण आहे," असे म्हणत कुमार विश्वास यांनी पाकिस्तानी जनतेला आपल्या लष्कराविरोधात उभं राहण्याचे आवाहन केले. "लष्करानेच तुमच्या लोकशाहीला गाडले आहे. आता स्वतःची अस्मिता आणि स्वातंत्र्य जपायचं असेल, तर उठून उभे राहा."
बलुचिस्तानसाठी खुलेपणाने समर्थन
कुमार विश्वास यांनी बलुचिस्तानबाबत आपल्या भावना स्पष्ट केल्या. "बलुच जनतेने अनेक अत्याचार सहन केले आहेत. मी त्यांच्यासोबत उभा आहे. ईश्वर आणि अल्लाह दोघांजवळ प्रार्थना करतो की मला लवकरच एक स्वतंत्र बलुच राष्ट्र पाहायला मिळो. मी तिथे वीजा घेऊन जाऊ आणि ते देखील आपल्या देशात आनंदाने येऊ शकतील," असेही त्यांनी सांगितले.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.