नवी दिल्ली : (Wing Commander Vyomika Singh) भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले असून त्यांनी आपले सैन्य पुढे सरकवायला सुरुवात केली असल्याची माहिती शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने नागरी विमानांच्या आडून हल्ले केले असून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या खोट्या दाव्यांविषयी विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, "पाकिस्तानने भारतीय एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचे, सुरत आणि सिरसा येथील हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे करून, सतत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.पाकिस्तानने पसरवलेल्या या खोट्या दाव्यांचे भारत स्पष्टपणे खंडन करतो." त्या पुढे म्हणाल्या की, "पाकिस्तानी सैन्याने आपले सैन्य पुढच्या भागांकडे हलवले आहे, यामुळे तणाव आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. भारतीय सशस्त्र दल उच्च ऑपरेशनल तयारीत आहेत आणि सर्व शत्रुत्वाच्या कृतींना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि प्रमाणानुसार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानने योग्य प्रतिसाद दिला तर हा तणाव न वाढवण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येणार आहे", अशी माहिती आज विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत दिली.
"पाकिस्तानने जाणूनबुजून हवाई तळांना लक्ष्य केल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांनी जलद आणि सुनियोजित प्रत्युत्तर कारवाई केली. रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांना हवाई प्रक्षेपण, अचूक दारूगोळा आणि लढाऊ विमानांद्वारे लक्ष्य केले गेले. पसरूरमधील रडार साइट आणि सियालकोटमधील विमान तळाला देखील अचूक दारूगोळा वापरून लक्ष्य केले गेले. या कारवाई दरम्यान भारताने कमीत कमी नुकसान करण्याचा प्रयत्न केला", अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत आज दिली.