स्टार्टअपना योग्य गुंतवणुकीचा फंडा शिकवणारा अवलिया

    01-May-2025
Total Views |

स्टार्टअपना योग्य गुंतवणुकीचा फंडा शिकवणारा अवलिया



भारतातील तरुणांचा स्टार्टअप्सकडे कल वाढलेला दिसतो. परंतु, बरेचदा असे होते की, स्टार्टअप सुरू करताना आपल्या वैयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष होते. यात मग पुढे आर्थिक ओढाताण सुरू होते आणि त्यातूनच मग ते स्टार्टअप बंद पडतात. यामागचे एक कारण म्हणजे, योग्य वेळी योग्य ती गुंतवणूक न करणे, हे होय. अशा या महत्त्वाच्या ‘इन्व्हेस्टमेंट प्रोफायलिंग’ विषयावर स्वानंद समुद्र यांनी त्यांनी आजपर्यंत चार हजारांहून अधिक ग्राहकांना मार्गदर्शन केले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...


तरुण वेगवेगळ्या कल्पना घेऊन उत्साहाने स्टार्टअप सुरू करतात. ते काही काळ चालतातही; परंतु नंतर ते बंद पडतात. असं नेमकं का होतं?


कुठलाही उद्योग सुरू करतेवेळी भांडवलाची आवश्यकता असते. स्टार्टअप्सदेखील अशाच प्रकारे कर्ज किंवा तशाच प्रकारच्या भांडवलदारांकडून भांडवल घेऊन उद्योग सुरू करतात. परंतु, त्या पैशांचा उपयोग ते उद्योगासाठी न करता, त्यातून आपली प्रतिमा सांभाळायला जातात. मग ते कार्यालयातील अनाठायी खर्च, महागडे प्रवास, त्यातून काहीच निष्पन्न न होणे, यांसारख्या गोष्टी खूप होतात. त्यामुळे त्या भांडवलातून पुरेसा परतावा मिळत नाही. त्यामुळे काही काळानंतर त्यांची आर्थिक ओढाताण सुरू होते. यातच तुम्ही म्हटलात तसे स्टार्टअप बंद पडण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच उद्योजकाने त्याला मिळणार्‍या प्रत्येक पैशाचा फलदायी उपयोग कशा पद्धतीने करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आपण आता भांडवलाबद्दल बोललो. पण, बरेचदा स्टार्टअप्सची अशी भावना असते की, आपल्या धंद्यातील पैसा मी माझ्याच धंद्यात गुंतवेन, म्हणजे त्यातून माझा धंदा मोठा होईल. परंतु, आपण म्हणता की, हीच मोठी चूक आहे. हे कसे काय? मग योग्य नियोजन कसे असावे?


कुठलीही गुंतवणूक करताना आपल्याला एक सूत्र सांभाळणे गरजेचे आहे. कुठल्याही गुंतवणुकीतून परतावा हा कायम महागाई दरापेक्षा चार ते पाच टक्के जास्तच असायला हवा. स्टार्टअप सुरू करताना सुरुवातीला तो उद्योजक सर्वच गोष्टी स्वतः करत असतो. उद्योग विस्तारायला लागल्यावर सर्वच गोष्टी वाढत जातात. तेव्हा विचार केला पाहिजे की, आपण काम केल्यावरच तो धंदा चालणार आहे का? जर तसे असेल, तर ती धोक्याची घंटा आहे. आपण ‘पॅसिव्ह इन्कम’चादेखील विचार केला पाहिजे. यातून आपण आपल्यासाठी किती पैसे घेणार आहोत, धंद्यात किती गुंतवणूक किती होणार, भविष्याची तरतूद किती या सगळ्याचा विचार केला, तरच आपले आर्थिक नियोजन यशस्वी होते, हाच विचार असायला हवा उद्योजकाचा.

स्टार्टअप्सनी आपल्या भांडवलाचे, गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे आणि त्यातून जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी उपयोग कसा करावा?


उद्योजकाने हे लक्षात घेतले पाहिजे की, भांडवलनिर्मिती ही धंद्यासाठी असते, नफ्यातून गुंतवणूक करायची असते. त्यामुळे हा गैरसमज दूर केला पाहिजे. आपल्या नफ्याच्या दहा ते 15 टक्के गुंतवणूक ही भविष्यासाठी असली पाहिजे. याच नफ्यातून आपला खर्च, कंपनी चालवायचा खर्च या सर्व गोष्टी बाजूला पहिले काढणे गरजेचे आहे. गुंतवणूक ही दर महिन्याला करायची गोष्ट आहे. आज खूप मोठी गुंतवणूक केली आणि त्यातून मोठा परतावा मिळाला, असं होत नाही. दर महिन्याला गुंतवणूक होत राहिली, तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. तेव्हा आपल्या एकूणच व्यवहारांचा अंदाज घेऊन मगच गुंतवणुकीचे नियोजन करावे. यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा की, कुठलेही काम न करताना, मला सुट्टी घेणे जमले पाहिजे; तरच त्या गुंतवणुकीचा आपल्याला फायदा होतो.

स्टार्टअप्ससाठी ‘इन्व्हेस्टमेंट प्रोफायलिंग’ करुन देणे म्हणजे नेमकी ही प्रक्रिया कशी राबविली जाते?


गुंतवणुकीला सुरुवात करतेवेळी पहिला प्रश्न असतो की, आपला वैद्यकीय विमा आहे का; जर नसेल तर तो सर्वप्रथम काढा. आपला जीव पहिले सुरक्षित करा. त्यानंतर आपले उत्पन्न किती आहे, त्यातून मला माझे घर चालवायला किती पैसे लागतात, त्यानंतर जे पैसे उरतात, ते गुंतवणुकीसाठी; जी माझ्या भविष्यासाठी उपयोगी ठरेल. त्यासाठी मग ‘एसआयपी’, म्युच्युअल फंड्स, डेरिव्हेटिव्हज यांसारख्या पर्यायांचा अवलंब करावा. आपली गुंतवणूक ही कायम ‘रिस्क प्रुफ’ असावी. त्यामुळे आपल्याला कुठलीही परिस्थिती हाताळता येईल.

आपण चार हजारांहून जास्त लोकांना आतापर्यंत गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्त करून दिला आहे. त्यातील काही हृद्य अनुभवांबद्दल सांगा.


असे अनुभव अनेक आहेत. परंतु, एका आजोबांचा अनुभव सांगण्यासारखा आहे. हे आजोबा 86 वर्षांचे होते. त्यांनी तोपर्यंतच्या आयुष्यात पोस्ट आणि बँक या व्यतिरिक्त कुठेच गुंतवणूक केली नव्हती. त्यामुळे त्यांना म्युच्युअल फंडाबद्दल सांगणे, त्यांना ते पटणे खूपच आव्हानात्मक होते. त्यांना ते इतके विश्वासार्ह वाटले की त्यांनी त्याच दिवशी एकदम 20 लाखांपासून गुंतवणुकीला सुरुवात केली. 86व्या वर्षी त्यांनी सुरुवात केली आणि 92व्या वर्षी त्यांचा काही कोटींचा पोर्टफोलिओ झाला होता. ही एक अतिशय आठवणीत राहिलेली गोष्ट आहे.

(मुलाखत : हर्षद वैद्य)