मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pakistan border after Pahalgam Attack) पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेजवळील सीमावर्ती भागात भिती आणि शांततेचे वातावरण दिसते आहे. या भागांतील गावांमध्ये केवळ जनजीवनच थांबले नाही तर तेथील मशिदींमध्ये नमाज सुद्धा सध्या होताना दिसत नाहीयेत. यामुळे भीतीपोटी सामीवर्ती भागातील लोक परिसर सोडून पाकिस्तानकडे गेले असण्याची शक्यता निर्माण होतेय.
हे वाचलंत का? : जातगणनेच्या निर्णयावर काय म्हणाले भैय्याजी जोशी?
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या आर. एस. पुरा सेक्टरमधील शेवटचे गाव असलेल्या सुचेतगडमध्ये काही भारतीय शेतकरी सध्या गहू कापणीत व्यस्त आहेत. परंतु सीमेच्या पलीकडे पाकिस्तानी बाजूला पूर्ण शांतता पसरली असून संपूर्ण परिसर ओसाड पडल्याचे निदर्शनास येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शेतात काम होत नाहीये आणि गुरेढोरेही नेहमीप्रमाणे दिसत नाहीत.
स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की हल्ल्यापूर्वी पाकिस्तानच्या बाजूने बरीच हालचाल सुरू होती. पाकिस्तानी शेतकरी त्यांच्या शेतात नियमितपणे काम करायचे आणि अनेकदा त्यांची गुरे चारण्यासाठी भारतीय सीमेजवळ आणायचे. पण आता तिथे सगळं शांत आहे. गावातील सरपंच म्हणाले, पाकिस्तानच्या मशिदींमधून अजानचा आवाज थांबल्याचे आम्ही पहिल्यांदाच पाहिले आहे. हे फक्त कारगिल युद्धादरम्यान घडले होते. भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानातील सियालकोट भागातील कजरियाल, उन्ची बैंस, कासिरे आणि गुंगा ही गावे आता उजाड झाली आहेत. स्थानिकांच्या मते, पाकिस्तानी रेंजर्स आता त्यांच्या टॉवर्सवरून भारतीय भूभागावर लक्ष ठेवून आहेत परंतु त्यांच्याकडून कोणतीही सार्वजनिक हालचाल दिसून येत नाही. भारतीय गावकऱ्यांना भीती आहे की काही घुसखोरी किंवा संशयास्पद हालचाली होऊ शकतात, म्हणून सीमावर्ती गावांमध्ये दक्षता वाढवण्यात आली आहे.