मुंबई : (Lawrence Bishnoi Gang Threatens Pakistan) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली. या गँगच्या धमकीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्टमध्ये काय म्हटलंय?
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा कोणताही दोष नसताना त्यांची हत्या झाली. आम्ही लवकरच त्याचा बदला घेऊ. पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांच्या हत्येचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून फक्त एका अश्या व्यक्तीला मारू जो एक लाखाच्या बरोबरीचा असेल", असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.या पोस्टसोबत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा फोटोही लावण्यात आला आहे आणि त्यावर फुली मारण्यात आली आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतातील गुन्हेगारी कृत्यांशी संबंधित असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने अनेक वेळा सोशल मीडियावरून आपल्या गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. आता संबंधित पोस्टमध्ये किती तथ्य आहे आणि ही पोस्ट खरोखरच या टोळीकडून करण्यात आलीय का? हे निश्चित होऊ शकलेले नाही. मात्र, ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\