पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वीच दहशतवादी बैसरन खोऱ्यात! 'या' कारणामुळे हल्ला लांबणीवर
01-May-2025
Total Views |
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला असून याबाबत आता एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे. हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात असल्याची माहिती एनआयएच्या तपासात पुढे आली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील ६ जणानी आपला प्राण गमावला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असून पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असून या घटनेशी संबंधित प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. अशातच हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच पाकिस्तानी दहशतवादी बैसरन खोऱ्यात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच हा हल्ला २१ एप्रिल रोजीच होणार होता. परंतू, बैसरन खोऱ्यात गर्दी कमी असल्याने दहशतवाद्यांनी हल्ला पुढे ढकलल्याचेही सांगण्यात येत आहे. याशिवाय हल्ल्याच्या एक आठवड्याआधी दहशतवाद्यांनी चार वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी केल्याचीही माहिती पुढे आली आहे.