मुंबई, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारताच्या डिजिटल वाटचालीचं जोरदार कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं विशेष गौरव केलं. “आज भारत एक आघाडीचा डिजिटल राष्ट्र म्हणून समोर आला आहे,” असं सांगत त्यांनी सांस्कृतिक आणि सर्जनशीलतेच्या दृष्टीने नव्हे तर रणनीती आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही मीडिया आणि तंत्रज्ञानाचा संयोग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं अधोरेखित केलं.
अंबानी म्हणाले की, “कथा सांगण्याची कला आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचा संगम हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही. तो भारताला जागतिक नवोन्मेषाच्या नकाशावर एक आगळी ओळख निर्माण करून देऊ शकतो.”
याच भाषणात त्यांनी भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यातील संधींबाबतही आशावाद व्यक्त केला. “सध्या २८ अब्ज डॉलर्सच्या आसपास असलेली भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाची किंमत पुढील दशकात १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याची शक्यता आहे,” असं भाकीत त्यांनी केलं.
या प्रगतीमुळे केवळ उद्योजकतेला चालना मिळणार नाही, तर लाखो रोजगारनिर्मिती होईल आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांना बळकटी मिळेल, असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं.
वेव्स २०२५ सारख्या उपक्रमातून भारताचे सर्जनशीलतेतील नेतृत्व अधिक बळकट होईल, असं म्हणत अंबानींनी उद्योग आणि सरकारच्या भागीदारीतून निर्माण होणाऱ्या नव्या संधींवर भर दिला.