"जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने देशात..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    01-May-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिल्याने देशात सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरु झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत या निर्णयासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक आहे. भारतात १९३१ नंतर पहिल्यांदाच जातीय जनगणना होते आहे. यापूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारने आम्ही जातीय जनगणना करणार असा निर्णय केला. पण त्याला त्यांच्याच मंत्रिमंडळात विरोध झाला आणि त्यांनी जनगणनेच्या ऐवजी ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून सर्वे केला. पण त्याचे आकडे कधीच प्रकाशित झाले नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आता गप्प का? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल
 
काँग्रेस पक्षाने अनेक वर्षे केवळ राजकारण केले
 
"सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असल्यास जनगणनेच्या माध्यमातून समाजात कोण मागे राहिले याचा डेटा येईल आणि आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन देशाला आणि सर्व समाजांना वेगाने पुढे नेता येईल. यादृष्टीने हा अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे. काँग्रेस पक्षाने गेले अनेक वर्षे जातनिहाय जनगणनेच्या मागणीला मान्यता न देता केवळ राजकारण केले. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिल्याने देशात सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरु झाले आहे," असेहीते म्हणाले.