मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bhaiyyaji Joshi on Caste Census) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात जातगणना करण्याचा अनपेक्षित निर्णय घेतला. दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत देशासाठी जे काही आवश्यक आहे ते केलेच पाहिजे, असे ते म्हणाले.
वास्तविक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजासाठी कार्यरत आहे. त्यामुळे जातजनगणनेचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हावा तसेच मुद्दा हाताळताना सर्व पक्षांनी सामाजिक सलोखा व एकात्मता कोणत्याही कारणाने भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे रा. स्व. संघाचे मत असल्याचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.