‘पुष्पा 2’ नंतर आयुष्यात मोठा बदल जाणवतोय ; अल्लू अर्जुनचं भावनिक वक्तव्य!
01-May-2025
Total Views |
मुंबई, दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ब्लॉकबस्टर हिट पुष्पा 2 मुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या यशानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला, यावर विचारले असता अल्लू अर्जुन म्हणाला की, "प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाला कसं उत्तर द्यायचं, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. मी एक नैसर्गिक अभिनेता आहे, आणि अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे."
एका समिटमध्ये सहभागी झालेल्या अल्लू अर्जुननं आपल्या 'पुष्पा' सिग्नेचर स्टाईलने उपस्थितांची मने जिंकली आणि जल्लोषात रंग भरले.
फिटनेसविषयी विचारल्यावर तो म्हणाला, "फिटनेस हा प्रत्येक अभिनेत्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः भारतीय अभिनेत्यांसाठी — कारण आपल्याला अभिनयासोबतच नृत्य करावं लागतं, अॅक्शन सीन करावे लागतात आणि शेड्युल केव्हा सुरू होईल, याचा काही नेम नसतो. त्यामुळे फिटनेस कायम सांभाळणं खूप गरजेचं आहे. मी वयाच्या १९-२० व्या वर्षी याची सुरुवात केली. या प्रवासात अनेक अनुभव आले, दुखापतीही झाल्या, पण जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर आपलं रूप बघतो, तेव्हा त्या सगळ्या मेहनतीचं चीज झालेलं वाटतं."
अल्लू अर्जुन हा दक्षिणेतील पहिल्या काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी ‘सिक्स पॅक’ बडीलपणाने साकारले. 'वेव्ह्स समिट'मध्ये त्यानं यामागचं कारण उघड केलं. तो म्हणाला, "हे सगळं मानसिकतेवर अवलंबून असतं. २० वर्षांपूर्वी मी ठरवलं होतं की एक जण तरी हे बदलू शकतो. कोणीतरी मला म्हणालं होतं, 'दक्षिणेचे अभिनेते कधीच सिक्स पॅक बनवू शकत नाहीत.' मी जिच्यासोबत काम करत होतो, त्या अभिनेत्रीने असं विधान केलं होतं. आणि मग ते एक आव्हानच बनलं. मी ठरवलं की हे करून दाखवायचंच, आणि शेवटी मी ते केलं."
अल्लू अर्जुनच्या या प्रेरणादायी प्रवासातून हे स्पष्ट होतं की चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ‘पुष्पा’सारख्या भूमिकेत जीव ओतून काम करणारा हा अभिनेता अजूनही स्वतःला सतत नव्याने सिद्ध करत आहे.