- "वेव्हज"च्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुंतवणूकदारांना साद
- जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेला मुंबईत सुरुवात
01-May-2025
Total Views |
मुंबई, "भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. आमच्या पर्वतांमध्ये संगीत आहे, येथील नद्या कायम गुणगुणत असतात. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ भारतीय परंपरेत आहे. आमच्याकडे जगाला देण्यासाठी हर तऱ्हेचा कॉन्टेन्ट (आशय) आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड' हे स्वप्न साकार करण्याची", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज'च्या व्यासपीठावरून जगभरातील गुंतवणूकदारांना साद घातली.
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल.मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते. दि. १ ते ४ मेदरम्यान चालणाऱ्या या परिषदेत ९० देशांमधील तब्बल १० हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
मराठी भाषेत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आज गुजरातचाही स्थापना दिवस आहे. जगभरातील गुजराती बांधवानाही शुभेच्छा. आज ९० हून अधिक देशातील कलाकार, क्रिएटर, गुंतवणूकदार, धोरणकर्ते येथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत भारतामध्ये मनोरंजन क्षेत्रातील जागतिक अर्थसाखळीचा पाया रचला जात आहे. ही खऱ्या अर्थाने, संस्कृती आणि सृजनशीलतेची लाट (वेव्ह) आहे.
११२ वर्षांपूर्वी दि. ३ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी त्याची निर्मिती केली. 'रुस'मध्ये राज कपूर, 'कान' सत्यजित रे आणि ऑस्करमधील 'आर.आर.आर'च्या यशातून भारतीय सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याचे सिद्ध होत आहे. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता उपशिर्षकासह भारतीय कंटेंट पाहतात, हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा
- भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
- आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही, तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधानांनी जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन केले.
- आज जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.