जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आता गप्प का? मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

    01-May-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का? असा सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बावनकुळेंनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत विरोधकांना सवाल केला.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचे औदार्य दाखवणार की, नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे."
 
हे वाचलंत का? -  भारताच्या विकासात महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
 
विरोधकांकडून श्रेय लाटण्याचे काम सुरु
 
"केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षात या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. आता मोदीजींच्या सरकारने या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला असताना त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत. यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली आहे, मोदीजींनी जातीनिहाय जनगणनेसारखा क्रांतिकारी निर्णय घेतला. तेव्हा किमान अभिनंदन करण्याचे सौजन्य या नेत्यांनी दाखवावे ही अपेक्षा आहे," असेही ते म्हणाले.