( MLA Vishwanath Bhoir ) वाढत्या शहरीकरणामुळे सध्या पाणीप्रश्न, वाहतुककोंडी, कचरा या समस्या दिवसेंदिवस जटिल झाल्या आहेत. एकीकडे विकासाच्या माध्यमातून शहर कात टाकत असताना, दुसरीकडे या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. “मतदारांनी मला दुसर्यांदा निवडून दिले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असलेल्या कल्याणचा वारसा जपताना, शहरातील समस्या सोडविण्याचे मिशन हाती घेतले आहे,” असे प्रतिपादन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले. आज, दि. 4 एप्रिल रोजी आमदार विश्वनाथ भोईर यांचा वाढदिवस. वाढदिवसाचे औचित्य साधत दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आ. विश्वनाथ भोईर यांनी मांडलेले कल्याणच्या विकासाचे व्हिजन...
आपण शिवसेनेत विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून प्रवेश केला. त्यावेळी राजकारणात पदार्पण करावेसे का वाटले?
मी एका सामान्य कुटुंबातून आलो आहे. माझ्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. महाविद्यालयीन जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून ‘सीआर’पदी निवडून आलो. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांची तेव्हा एक-दोन वेळा भेटही झाली होती. त्यातून शिवसेनेच्या कार्याची छाप पडत गेली. शिवसेनेचे काम करावे असे वाटू लागले. त्याकाळी कल्याणमध्ये शिवसेनेची शाखा नव्हती. धर्मवीर आनंद दिघे यांनी कल्याणमध्ये शाखा उघडायला लावली. 1992 साली कल्याणात शाखा उघडली आणि खर्या अर्थाने राजकारणात प्रवेश झाला.
आपण आजवरच्या राजकीय प्रवासात खूप मोठा पल्ला गाठला आहे. अगदी शाखाप्रमुख पदापासून ते आमदारकीपर्यंत, आपण राजकारणाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरला आहात. त्याविषयी काय सांगाल?
राजकारणात प्रवेश केला, त्याकाळी सोशल मीडियाचा फारसा प्रभाव नव्हता. शिवसेनेच्या सभांना मी जात होतो. त्या सभांमधून प्रेरित झालो आणि शिवसेना मनात वाढत गेली. कल्याण-डोंबिवली महापालिकेची 1995 साली निवडणूक झाली. त्या निवडणुकीत वहिनीला निवडून आणले. तिथून राजकीय घोडदौड सुरु झाली. 2000 साली माझ्या गळ्यात नगरसेवकपदाची माळ पडली. मग मीदेखील राजकारणात एक एक पायरी पुढे चढत गेलो. पहिल्यांदा शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपशहरप्रमुख, शहरप्रमुख त्यानंतर आमदार झालो. प्रारंभी धर्मवीर आनंद दिघे, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या आदरस्थानी होते. त्यामुळे जिथे एकनाथ शिंदे साहेब तिथे आपण, असे समीकरण झाले. महायुतीचे सरकार आले, तेव्हा शिंदे साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
समाजकारणात आणि राजकारणात प्रत्येकाचे एक प्रेरणास्थान असते. तेव्हा, आपले राजकीय क्षेत्रातील आदर्श कोण?
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आदर्श सांगायचे झाले, तर माझ्यावर सर्वांत जास्त पगडा हा धर्मवीर आनंद दिघे यांचाच आहे. ‘बीए’ झाल्यानंतर मला नोकरीची गरज होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने कोणीतरी दिघे साहेबांकडे जावे, असे मला त्यावेळी सूचविले. तेव्हा दिघे साहेबांनी मला कुठे राहतो, असे विचारले. त्यानंतर कल्याण उंबर्डे आणि सापर्डे भागात शिवसेनेची शाखा नाही, असे त्यांनी मला सांगितले. तसेच तिथे शाखा उघडण्याचा सल्लाही दिघे साहेबांनी मला दिला. मग शाखा सुरु झाली आणि नागरिकांच्या हाकेला धावून जाऊ लागलो. कारण, शिवसेनेत राजकारण नसते, समाजकारणच जास्त असते. दिघे साहेबांनी समाजसेवेचे बीज माझ्यामध्ये रोवले. त्यामुळे माझा खरा आदर्श तेच आहेत आणि आजच्या राजकारणाच म्हणाल तर एकनाथ शिंदे साहेब हे माझा राजकीय आदर्श आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा ऐतिहासिक वास्तूंनी व्यापलेला परिसर. तेव्हा या मतदारसंघातील अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी शासनदरबारी आपण काय प्रयत्न केले?
कल्याण शहर हे ऐतिहासिक वास्तूंनी व्यापलेले आहे. त्या वास्तूंचे जतन व्हावे, यासाठी शासनदरबारी आपण पत्रव्यवहार केला आहे. त्यात किल्ले दुर्गाडीबाबत यशही मिळाले. किल्ले दुर्गाडीची पडझड झाली होती. 2015 मध्ये ‘किल्ले दुर्गाडी समिती’च्या अध्यक्षपदी माझी नेमणूक झाली. या भागात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवांसाठी आनंद दिघे साहेब स्वत: दुर्गाडी येथे आले होते. या परिस्थितीत काही अपघात झाल्यास उत्सवाला गालबोट लागेल, असे दिघे साहेबांच्या त्यावेळीच आम्ही निदर्शनास आणले. आजही किल्ल्याच्या संवर्धनासाठी अनेक प्रकल्प नियोजित आहेत. तसेच कल्याण शहरातील तलावसंवर्धन करण्याचे विचाराधीन आहे. पारनाका येथील ऐतिहासिक वास्तूंना हेरिटेजचा दर्जा दिला आहे. त्या वास्तू जतन करून तिथे कॉरिडोर करण्याचा विचार सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम कुठपर्यंत आले आहे?
दुर्गाडी किल्ल्याचे काम प्रगतिपथावर आहे. या किल्ल्याच्या पुनर्रचनेसाठी सामग्री बाहेरून येते. त्यामुळे काम होण्यास अधिक विलंब लागत आहे. पण, हे कामही लवकरच पूर्णत्वास येईल. जुन्या पद्धतीच्या गडकोटांची बांधणी ज्या पद्धतीने केली जात असे, तशाच पद्धतीने या किल्ल्याची पुनर्बांधणी होत आहे. मध्यंतरी एका विशिष्ट समूहाने या कामात व्यत्यय निर्माण केला होता. मात्र, आता पुन्हा नेटाने काम सुरू आहे.
गेल्या पाच वर्षांत आपण कल्याण पश्चिम मतदारसंघात केलेल्या उल्लेखनीय कामांविषयी काय सांगाल?
कोणत्याही शहराचा विकास करायचा असेल, तर सर्वप्रथम पाया मजबूत हवा असतो. त्याशिवाय विकासकामांना सुरुवात करता येत नाही. आधीच्या आमदारांनी पाया रचला होता. त्यावर विटा रचण्याचे काम मी केले. त्यामध्ये रिंगरोड, दुर्गाडी किल्ला, पत्रीपूल, वडवली उड्डाणपूल यांची कामे केली. रिंगरोडमध्ये ज्या अडचणी आल्या, त्या सोडविण्याचे काम केले. कल्याणमधील सर्वांत मोठी समस्या वाहतुककोंडीची आहे. वाहतुककोंडी फोडण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत स्थानक परिसराचा कायापालट आपण करीत आहोत. 80 टक्के कामे सुरू झाली आहेत. मे महिन्यापर्यंत बरीचशी कामे पूर्ण झालेली असतील. गेल्या पाच वर्षांपासून मी पाणीप्रश्नासाठी विधानसभेत लढा देत आहे. कल्याण-डोंबिवलीला वाढीव पाणी देऊ शकत नाही, तर एक स्वतंत्र धरण देण्याची मागणी केली आहे. आता काळू धरण आणि कुशीवली धरण प्रस्तावित होते. परंतु, त्यात काही अडचणी आहेत. त्यामुळे विक्रमगड, पालघर येथे देहरजी धरणाचे पाणी ठाणे, भिंवडी, कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले जाईल. त्यामुळे या शहरातील पाण्याचा काहीअंशी प्रश्न सुटेल. शहरात 100 खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधून तयार असून, तेही लवकरच सुरू होईल. कल्याणमधील गरिबांतील गरिबांना तिथे उपचार मिळतील. वाहतुककोंडी, आरोग्य, पाणी या समस्या सोडवा, ही नागरिकांची आग्रही मागणी असल्याने त्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. रस्त्याचे चांगले जाळे तयार केले आहे. येत्या वर्षभरात अनेक प्रकल्प मार्गी लावणार आहे.
आगामी पाच वर्षांच्या कालावधीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी कोणत्या नवीन योजना आपण आखल्या आहेत?
कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी आगामी काळासाठी अनेक योजना प्रस्तावित आहेत. पण, आम्ही नागरिकांच्या मुख्य समस्यांकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. क्रीडांगण, मैदाने प्रस्तावित आहेत. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी धरणाचीही मागणी केली आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालय निर्माणाधीन आहे. शहराची लोकसंख्या वाढत आहे, तशा साहजिकच नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. सध्या परिसरात चांगले न्यायालय व्हावे, अशीदेखील मागणी आहे. रिंगरोडचे काम पूर्ण करायचे आहे. वचननाम्यात दिलेली 90 टक्के विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यामुळेच मतदारांनी मला पुन्हा निवडून दिले. कल्याणमध्ये बाहेरगावावरून आलेल्या पाहुण्याला दहा वर्षांपूर्वीचे शहर आणि आताचे शहर यांत फरक दिसला पाहिजे आणि त्यांनी तो आपल्या मित्रांना सांगितला, तरी खूप काही जिंकल्यासारखे आहे.
शहराच्या विकासासाठी माझे मोठे ‘व्हिजन’ आहे. ‘मेट्रो’साठी निधीची तरतूद करून ठेवली आहे. ‘मेट्रो-5’ टिटवाळ्यापर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. रस्ते, किल्ले दुर्गाडी, टिटवाळा मंदिर, पाणीप्रश्न, सुपरस्पेशालिटी रुग्णालय या गोष्टी समोर ठेवल्या आहेत. पण, पाणी नसेल तर नागरिक ‘व्हिजन’ घेऊन काय करणार? त्यामुळे आधी या समस्या सोडविणे हेच मुख्य ध्येय आहे.
आपले चिरंजीव वैभव भोईर यांनीदेखील सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. त्याविषयी काय सांगाल?
निवडणूक प्रचारादरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे प्रचार करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी एक टीम बनविली आणि सर्वजण प्रचारात उतरले. त्याच काळात वैभवनेही निवडणूक प्रचाराच्या कामाला सुरुवात केली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आम्ही सर्वच ठिकाणी काम केले होते. त्यामुळे लोक त्याचीही वाट पाहात असत. लोकांनी त्याला स्वीकारले. त्यामुळे वैभवलाही कामात हुरुप आला. लोकांना जर तो आवडला, तर त्याला आम्ही कुटुंबीय नक्कीच त्याला मदत करू. पण, त्याने प्रथम स्वतःला सिद्ध करावे. विश्वनाथ भोईरचा मुलगा म्हणून नाही, तर वैभव भोईर असे त्याने सिद्ध व्हावे. मला कोणताही राजकीय वारसा नव्हता. मी इच्छाशक्तीच्या जोरावर आणि कार्यावर येथपर्यंत पोहोचलो आहे. त्यातून त्यानेही धडा घ्यावा. लोकही मग आपोआप नेतृत्व स्वीकारतात.
आपल्या वाढदिवसानिमित्त आज कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत?
समाजकार्य हा आमचा पिंड आहे. त्यामुळे दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनीही काही कार्यक्रम आयोजित केले आहेत. वृद्धाश्रमात फळवाटप, मूक-बधीर विद्यालयात अन्नवाटप, महाआरोग्य शिबीर यांसारखे आयोजित केले आहेत. काही ठिकाणी वस्तूंचे वाटप करणार आहोत. जसे की, बुद्धविहारामध्ये खुर्च्यांचे वाटप करणार आहे. ‘छावा’ हा चित्रपट महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी अजूनही पाहिलेला नाही. त्यांना ते तिकीट परवडणारे नाही. त्या विद्यार्थ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, यासाठी ‘छावा’ चित्रपट दाखविणार आहोत. दोन दिवसांपूर्वीच ही संकल्पना सूचली. त्यामुळे येत्या काळात महापालिका शाळेतील सर्वच मुलांना हा चित्रपट दाखविण्याचा मानस आहे.