Mumbai Police Commissioner Deven Bharti : ३५ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आयुक्तपदासाठी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शासनाचा आदेश जारी करण्यात आला असून उद्या म्हणजे गुरुवार दि. १ मे रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. अनेक हाय प्रोफाईल प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती नेमके कोण आहेत, आतापर्यंत त्यांची कारकिर्द कशी राहिलीय? याचीच माहिती घेऊयात...
२६/११ अर्थात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्व करणाऱे धडाकेबाज आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे मुंबईच्या पोलिस आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. ते मावळते पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या जागी रुजू होणार आहेत. देवेन भारती हे मूळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील आहेत. ते ललित नारायण मिथिला विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्राध्यापिका भारती श्रीवास्तव आणि त्रिपुरारी शरण यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण झारखंडमध्ये झाले असून त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पहिलीच पोस्टींग गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात सहायक पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर गडचिरोली अमरावती आणि अकोला येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिलं. १९९८ ते २००३ दरम्यान त्यांनी गुप्तचर विभागातही काम केले. २००३ मध्ये मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून रुजू झाले. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध विभागात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भारती हे त्यांचे नेतृत्व, धोरणात्मक विचार आणि गुन्हेगारी नियंत्रणातील कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात.
४ जानेवारी २०२३ रोजी त्यांची मुंबई पोलिस दलाच्या इतिहासातील पहिल्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून सर्व सहपोलीस आयुक्त त्यांना अहवाल देतात, तर ते मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करतात. तसेच यापूर्वी त्यांनी सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांसारख्या महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात भारती मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी म्हणून नावारुपास आले होते.
मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदी नेमणूक करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात, भाजपा नेते हैदर आझम यांच्या पत्नीविरुद्ध खटला सुरू करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल भारती यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता, आझम यांच्या पत्नीवर पासपोर्ट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप होता. तरीही, पोलीस तपासात कोणतेही पुरावे आढळले नाहीत आणि भारतींचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला नाही, त्यावरुन वाद निर्माण झाला होता.
भारती यांचा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सहभाग होता. २६/११ च्या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला फाशीवर लटकवण्यात भारती यांचा मोठा रोल होता. त्याचबरोबर एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. आता मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर देवेन भारती यांच्यासमोर मुंबईतील गुन्हेगारी, शहराची सुरक्षा तसेच कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक नियमनासोबतच बरीच महत्वाची आव्हाने असणार आहेत. या सगळ्यांत त्यांची कार्यक्षमता आणि नेतृत्वाकौशल्यांचा कस लागणार आहे.