- दि. 5 ते दि. 9 मेदरम्यान आयोजन; डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची वाटचाल
30-Apr-2025
Total Views |
मुंबई: ( unique initiative called Tech Wari Tech Learning Week ) सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने ‘टेक’वारी - ‘टेक लर्निंग वीक’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्व स्तरांवरील कर्मचार्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञान, साधने आणि विचारसरणीने सज्ज करणारा हा उपक्रम आहे. दि. 5 मे ते दि. 9 मे रोजीदरम्यान मंत्रालयात हा प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे.
हा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्राच्या प्रशासनात होणार्या डिजिटल परिवर्तनातील आघाडीचा ठरणार आहे. वारी या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित ‘टेक’वारी ही समर्पण आणि सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहे, जे शासनाच्या कर्मचार्यांमध्ये निरंतर शिक्षण व सहयोगाची भावना जागृत करते. या सामूहिक प्रवासाचा उद्देश म्हणजे कर्मचार्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाकरिता सक्षम करणे हा आहे.
‘टेक’वारीचा गाभा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सर्व शासकीय कर्मचार्यांसाठी सहज-सोपे आणि समजण्याजोगे बनवणे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सुरक्षा, डिजिटल फायनान्स अशा क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे हे जटिल विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील. प्रशासन सक्षमीकरण, सेवा प्रदान व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल, हे सांगितले जाईल.
केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे, तर मानसिक व भावनिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी ‘टेक’वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपी, ध्यानधारणा, कार्यजीवन समतोल या विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे एक संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडवण्यास मदत होईल.
प्रसिद्ध वक्त्यांचा सहभाग
या कार्यशाळेत सुप्रसिद्ध वक्त्यांचा समावेश असून ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रभू गौर गोपाल दास यांचे दि. 5 मे रोजी व्याख्यान होणार आहे. ‘प्रवास पाककृतीचा’या विषयावर दि. 6 मे रोजी सुप्रसिद्ध शेफ मधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे. ‘आरोग्यपूर्ण जीवनशैली’ या विषयावर रूजुता दिवेकर यांचे दि. 7 मे रोजी, तर ‘जीवन संगीत’ या विषयावर डॉ. संतोष बोराडे यांचे दि. 8 मे रोजी ध्यान आणि अंतरिक शांती या विषयावर व्याख्यान होणार आहेत.