संधीचे सोने कसे करावे हे ज्यांच्याकडे पाहून प्रत्येकाने शिकले पाहिजे, अशा सुप्रसिद्ध निवेदिका साधना योगेश कारंडे-जोशी यांच्याविषयी...
असे म्हणतात, एखादा कार्यक्रम रंगणार की पडणार याची पहिली चाहूल हा निवेदक देत असतो. मात्र, पडलेला कार्यक्रमही उत्तमरित्या सावरण्याचे खरे कसब ज्यांच्याकडे आहे, अशा निवेदिका म्हणजे साधना योगेश कारंडे-जोशी. शिक्षिका ते निवेदिका हा त्यांच्या आयुष्यातील प्रवास एखाद्यास नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
ठाणे शहरात होणार्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमात आपल्या नेमक्या निवेदनातून वेगळी छाप उमटवणार्या सुप्रसिद्ध निवेदिका म्हणून आज साधना कारंडे-जोशी यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. सांगलीच्या तडसर गावातील त्यांचा जन्म. पहिलीचे शिक्षण कुर्ल्यातील गाडगेबाबा शाळा येथे झाले, तर दुसरीपासूनचे पुढील शिक्षण, ठाणे शास्त्रीनगर येथील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील एकटेच कमावते, आई सातवीपर्यंत शिकलेली. परंतु, असे असले तरी आई प्रचंड हुशार होती व तिला पूर्वीपासून वाचनाचीही आवड होती. राहते घर म्हणाल, तर दहा बाय दहाची चाळीतली खोली. साधना म्हणतात, “आईस्क्रीम नावाची गोष्ट लहान वयात खाण्याचा कधी योगच आला नाही. इतकी प्रतिकूल परिस्थिती असली, तरी आपल्या मुलींनी मात्र शिकले पाहिजे, असा विचार आईवडिलांनी कायमच केला. त्यांनी कधीच लवकर लग्न लावून देण्याचा विचार केला नाही.” साधना पाच बहिणींमध्ये दुसर्या क्रमांकाच्या. पहिली बहीण त्यांच्याहून दीड वर्षांनी मोठी. त्यामुळे साधना यांनी दहावीपर्यंत मोठ्या बहिणीचेच कपडे, चपला, पुस्तके इत्यादी वस्तू वापरल्या. दहावीनंतर पुढे ‘डीएड’चा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू असताना, साधना यांची योगेश जोशी यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर 2001 साली त्यांची लग्नगाठ जुळली. ‘डीएड’ करत असताना, प्राचार्य दत्तात्रेय मणेरीकर यांचा साधना यांच्यावर प्रचंड वैचारिक प्रभाव होता. साधना जोशी आणि योगेश जोशी हे दोघेही, मणेरीकर यांच्या तालमीत घडलेले. घरची परिस्थिती पाहता, वयाच्या अठराव्या वर्षीच साधना यांनी नोकरीला सुरुवात केली. कारण, लहान बहिणींचे शिक्षण आणि त्यातच वडिलांना घ्यावी लागलेली ‘स्वेच्छा निवृत्ती.’
नोकरी करत असतानाच त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘बीए’, ‘एमए’ केले. त्यासोबतच मधल्या काळात मुलांची शिकवणी घेण्यास सुरूवात केली. ठाण्यातील ’सावित्रीदेवी थिराणी हायस्कूल’ या शाळेतून त्यांनी, प्रथमतः शिकवण्यास सुरुवात केली. पुढे 1996 सालानंतर ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या डॉ. बेडेकर विद्यामंदिर शाळेत, त्या रुजू झाल्या. साधना यांचा निवेदन क्षेत्रातील प्रवास सुरू झाला, तो याच शाळेतील शिक्षक दीपक धोंडे यांच्या एका वाक्यामुळे. ‘तुम्ही छान बोलता, मग हे व्यावसायिकरित्या का करत नाही?’ त्यांचे हे वाक्य साधना यांनी गांभीर्याने घेतले आणि त्यादृष्टीने पुढे तयारी सुरू केली. सासर आणि माहेर या दोन्हीकडून त्यांना पाठिंबाही मिळत गेला. जसजसे या क्षेत्राकडे वळण्यास सुरुवात झाली, तसतसे निरनिराळ्या लोकांच्या भेटीगाठी होत गेल्या. अनेकांच्या ओळखी वाढत गेल्या. यातून काही कार्यक्रमात निवेदन करण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली. दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात, निवेदन करण्याची संधी साधना यांना मिळाली.
या प्रवासादरम्यान साधना स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक उत्तम पवार, यांच्या संपर्कात आल्या. त्यांच्या प्रेरणेतून पुढे त्यांना लिहिण्याची आवड निर्माण झाली. सावरकरांच्या कवितांचे भावानुवाद असलेले ‘जयोस्तुते’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. अशी त्यांची एकूण आठ ते नऊ पुस्तके, आजवर लिहून पूर्ण झाली आहेत. निरक्षर बंजारा व्यक्तीची संघर्षमय जीवनगाथा मांडणारे ‘बाज वडरो’ हे त्यांचे आठवे पुस्तक. या पुस्तकाचे दिल्ली येथे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.‘स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी माई सावरकर’ हे पुस्तक जेव्हा साधना यांनी लिहिले, तेव्हा पहिल्यांदाच सावरकर सदनात जाण्याचा साधना यांना योग आला. सावरकरांच्या सूनबाई सुंदरकाकू सावरकर यांनी ते पुस्तक वाचून, स्वहस्ताक्षरात साधना यांना आशीर्वादपत्र लिहिले आहे. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील एक मोरपिस आहे, असे त्या आवर्जून सांगतात.
वाचन, निवेदन, लिखाण या गोष्टी सुरू असतानाच ‘तुम्ही व्याख्यानाचे कार्यक्रम का नाही करत?’ म्हणून विचारणा झाली. यातून मग ‘ओवी ते अभंग’ कार्यक्रम, रसिक प्रेक्षकांसमोर आला. पुढे हळूहळू ‘सावरकर एक पंचाक्षरी मंत्र’, ‘मृत्युंजयी सावरकर’, ‘माई सावरकर’, ‘बहिणाबाई आणि अध्यात्म’, ‘आठवणीतले लोकमान्य टिळक’ असे एकूण, 15 हून अधिक विषय व्याख्यानरूपातून तयार झाले. या क्षेत्रात यायचे म्हणजे एकतर ओळख लागते, रूपेरी पडद्यावरील चेहरा लागतो किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी लागते. परंतु, यांपैकी कोणतेही भांडवल गाठीशी नसताना, साधना यांनी जी काही ओळख निर्माण केली ती स्वकष्टानेच! शाळा, घर आणि आपले कार्यक्रम या तिन्ही गोष्टी, त्या चतुराईने सांभाळतात. हे करत असताना, त्यांना कधीच थकवा जाणवत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, एकाच दिवशी दोन ठिकाणी केलेले निवेदन होय. एकाच दिवशी सातारा येथे, दिवाळी पहाट आणि संध्याकाळी ठाण्यातील हिरानंदानी येथे ‘दिवाळी रजनी’ कार्यक्रम त्यांनी केले आहेत. ‘कोरोना’ काळात सामाजिक कार्य केल्याबद्दल, तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते साधना यांचा सन्मान करण्यात आला. साधना जोशी यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!
माणसं
ओंकार मुळ्ये