अस्मिता : सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याचा दीपस्तंभ

    30-Apr-2025
Total Views |


अस्मिता : सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याचा दीपस्तंभ


कोणतीही कोणतीही संस्था 50व्या वर्षात पदार्पण करते, तेव्हा त्यामागे अनेकांचे अविरत कष्ट व समर्पण असते. समाजसेवेचा वसा असतो. जोगेश्वरीच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडणघडणीमध्ये ‘अस्मिता’ संस्थेचे स्थान महत्त्वाचे आहे. मागील 49 वर्षांचे सिंहावलोकल करून पुढील 50 वर्षांचे नियोजन करणे गरजेचे आहे. हे सर्व करत असताना या संस्थेच्या वाटचालीविषयी म्हणजेच स्थापनेविषयी थोडक्यात परिचय करून घेणे गरजेचे आहे.


सुमारे पाच दशकांपूर्वी मुंबईतील जोगेश्वरी उपनगरात समाज संघटन आणि परिवर्तन हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘अस्मिता’ या संस्थेची दि. 1 मे 1976 रोजी महाराष्ट्र दिनाला स्थापना झाली. जोगेश्वरीच्या विकसनशील भागात बालसंस्कारांबरोबर ज्ञानदानाच्या आणि प्रबोधनाच्या उद्देशाने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग खंडित होऊ नये, या उद्देशाने बालवाड्या सुरू करून बालसंस्कारवर्ग सुरू केले. घराघरांत जाऊन विद्यार्थ्यांना जमा करून त्यांना शिक्षणाशी जोडण्यास सुरुवात झाली. हीच ‘अस्मिता’च्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात. शिशुवर्ग, बालवर्ग, पहिली, दुसरी अशा चार इयत्ता जिथे जागा मिळेल, तेथे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. नंतर बांद्रेकरवाडी येथे एक मजली इमारत बांधली.

दि. 1 मे 1976 साली संस्थेने लावलेल्या या रोपट्याचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरीमुळे वटवृक्षात रूपांतर झाले. सद्यस्थितीत आजगावकर मैदानात ‘अस्मिता भवन’ नावाने उभ्या राहिलेल्या सहामजली इमारतीत पत्र्याच्या शेडमध्ये सतरंजीवर बसणारा विद्यार्थी अत्याधुनिक सुविधायुक्त वर्गात बसत आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, टिंकरिंग लॅब, गणित प्रयोगशाळा, मूलभूत अभियांत्रिकी शिक्षण, संगीत कक्ष, चित्रकला कक्ष, अत्याधुनिक प्रयोगशाळा, समुपदेशन केंद्र, आपल्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले कौशल्य विकास केंद्र, संगणक कक्ष म्हणजे अस्मिता संस्कृती. ही नेहमी काळाच्या पुढे पाहणारी आहे, याचे उत्तम उदाहरण.

त्यातच जोड म्हणजे मातृभाषेतून शिक्षण देताना ’खडज’, ’नॅब्याट’चे मानांकन, ‘आदर्श शाळा पुरस्कार’, ‘स्वच्छ शाळा पुरस्कार’ ही भूषणे ‘अस्मिता’च्या गौरवात भर घालतात. याचे कारणही तसेच आहे. ‘अस्मिता’ म्हणजे साध्या माणसांनी उभे केलेले असामान्य काम. ‘अस्मिता’चा आतापर्यंतचा प्रवास हा प्रयत्नमार्गी आणि प्रयत्नवादी कार्यकर्ते, हितचिंतक, पालक, संस्थाचालक यांच्यामुळे सुरू राहिला आहे आणि यापुढेही अखंड सुरू राहील आणि ’अस्मिता’कडे समाज सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी दीपस्तंभ म्हणून पाहील, हीच इच्छा ठेवून शालेय जीवनापासून मुलांमध्ये शिस्त, एकता, देशप्रेम निर्माण व्हावे, मुलांना सैनिकांच्या खडतर आयुष्याची ओळख व्हावी आणि सैन्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी संस्थेने आपल्या शाळेत ‘एनसीसी’ म्हणजेच ‘राष्ट्रीय छात्रसेना’ उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

‘अस्मिता’ सौरऊर्जेदारे आत्मनिर्भर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरऊर्जेद्वारे आत्मनिर्भर ऊर्जाक्षेत्राची कल्पना अनेकदा मांडली. त्या दृष्टीने ‘अस्मिता’ने धडाक्यात पावले टाकून ‘संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी पहिली शाळा’ असा मान ‘अस्मिता’ संस्थेला मिळवायचा आहे. या उपक्रमाद्वारे ऊर्जाबचत आणि स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल. त्याचबरोबर जोगेश्वरीकरांना हरित ऊर्जेसाठी प्रेरणा मिळेल.

अपंगत्वावर मात करत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदतरूप होण्यासाठी ‘अस्मिता’ने पुनर्वसन केंद्र स्थापन केले आणि त्या विद्यार्थ्यांना ’अमृत पुत्र’ आणि ‘अमृत कन्या’ नावाने गौरविले. 1989 साली दिव्यांग बांधवांसाठी जोगेश्वरी उपनगरात आयोजित केलेले शिबीर व त्या शिबिरातून प्रेरणा घेऊन संस्थेच्या आरोग्य प्रकल्पातून ‘अस्मिता’ संचालित मनोहर हरिराम चोगले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र (कल्याणी केंद्र) अशोकवन, बोरिवली येथे सुरू झाले. आज हे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असून ‘अमृत पुत्र’ व ‘अमृत कन्या’ यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने त्यांच्या क्षमतेनुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा ‘अस्मिता’चा प्रयत्न राहिला आहे. आज ‘अस्मिता’ने फिजिओथेरपी सेंटर सुरू करून अस्थिव्यंग, सांधेदुखी, सेरेबल पाल्सी, मणक्याचे विकार, जन्मतः व्यंग, अपघाती अपंगत्व, पॅरालिसीस रुग्णांसाठी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया यांवर मार्गदर्शन करण्यासाठी नियमित सकाळी 11 ते 5 या वेळेत तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सेवाकार्य सुरू केले आहे.

या कालावधीत प्रत्येक संस्थाचालकांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक टप्प्यावर संस्थेला काळानुरूप आधुनिक व जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न पाहून प्रत्यक्षात तशा योजना उपक्रम राबवले. त्याद्वारे झालेल्या बदलांना समाजमान्यता मिळाली, याचा प्रत्येकाला आनंद आहे. पण ती कुठल्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि एक एक गोष्ट साध्य होत गेली. सर्व देणगीदार, हितचिंतकांच्या मदतीने ‘अस्मिता’ अजून समृद्ध होत आहे. म्हणूनच ‘अस्मिता’ला जोगेश्वरीच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विश्वाचे दीपस्तंभ असणारी पितृतुल्य संस्था म्हणून गौरविले जाते.

लेखक संघटन व व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक आहेत.
प्रदीप भोईर