छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य, स्वराज्याचे साम्राज्यात झालेले रुपांतर आणि मराठ्यांच्या टाचांखाली आलेली दिल्ली, हा इतिहास महाराष्ट्रातील घराघरांत सुपरिचित. मात्र, देशाची राजधानी दिल्ली आणि प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये छत्रपतींचा इतिहास म्हणावा तसा अद्याप पोहोचलेला नाही. मात्र, हा इतिहास एका आगळ्यावेगळ्या संग्रहालयाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना बघण्याची आणि समजून घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे. त्यासाठी दिल्लीत 1981 सालापासून कार्यरत असलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’ने पुढाकार घेतला आहे. नवी दिल्लीतील कुतुब मिनारजवळ असलेल्या ‘कुतुब इन्स्टिट्यूशनल एरिया’ या भागामध्ये ट्रस्टचे एक एकरावर भव्य कार्यालय आहे. त्यातील 30 हजार चौ. फुटांमध्ये ‘गार्डियन मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट’ या कंपनीतर्फे या संग्रहालयाची उभारणी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर ‘गार्डियन मीडिया’चे संचालक संजय दाबके यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
महाराष्ट्रात शिवचरित्राचे अगदी घराघरात पारायण केले जाते. मात्र, दिल्लीत शिवचरित्र मांडण्यासाठी विशेष तयारी कशी केली?
मी आणि माझ्या सहकार्यांनी यापूर्वी आंबेगावची ‘शिवसृष्टी’ उभारण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडायचा, तर तो पुराव्यानिशीच, असे आमचे तत्त्व. त्यानुसार आंबेगावची ‘शिवसृष्टी’ उभारली आहे. त्यामुळे दिल्लीतही ते धोरण ठेवून आम्ही काम केले आहे. मात्र, दिल्लीत काम करताना आमच्यापुढे विशेष आव्हान नक्कीच होते. कारण, शिवचरित्र माहिती नाही, असे एकही घर महाराष्ट्रात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ‘शिवसृष्टी’ उभारताना आम्ही अगदी लहान लहान घटनाही दाखवू शकलो. मात्र, दिल्लीत असे करून चालणार नव्हते. दिल्लीकर, उत्तर भारतीय आणि दिल्लीत येणारे परदेशी पर्यटक पाहता, मोजक्याच घटनांद्वारे शिवचरित्र दाखविणे आवश्यक होते. त्यासाठी आम्ही शिवचरित्रातील विशेष घटनांची निवड केली.
हिंदीत शिवचरित्र मांडण्यासाठी काही आव्हाने आली का? इतिहास कशा पद्धतीने मांडण्याचे ठरवले?
हिंदीमध्ये अथवा इंग्रजीमध्ये शिवचरित्रावर फारच कमी लेखन झाले आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य आणि मराठ्यांचा इतिहास सखोलपणे माहिती नाही. त्यामुळे अलेक्झांडर ते नेपोलियन अशा जागतिक सेनानींच्या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे अधिक सरस आहे. कारण, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव सेनानी होते, ज्यांनी दुसर्याची भूमी बळकविण्यासाठी नव्हे, तर आपल्या समाजाचे आणि स्वत्वाचे रक्षण करण्याची भूमिका घेतली होती. जागतिक इतिहासात असे दुसरे उदाहरण सापडत नाही. त्यामुळे दिल्लीत संग्राहालय उभारताना शिवचरित्राचा असा पैलू मांडण्याचे आम्ही ठरवले.त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे झालेले साम्राज्यात रुपांतर हा आणखी एक पैलू दिल्ली आणि उत्तर भारतासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी आम्ही शिवचरित्राचा पुन्हा एकदा अभ्यास करून मोजक्या घटनांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.
शिवचरित्रातील घटनांची आपण या संग्रहालयासाठी निवड कशी केली?
दिल्लीतील या संग्रहालयात आम्ही पहिला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल, अशा शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग घेतला आहे. महाराजांच्या एका शब्दाखातर जीव देण्यासाठी तयार असणारी माणसे महाराजांनी जोडली होती, हे दाखवण्यासाठी तानाजी मालुसरे यांचा पराक्रम दाखवला आहे. त्याचप्रमाणे, शिवाजी महाराजांचे महत्त्व नेमके काय, हे समजून घेण्यासाठी शिवपूर्वकालीन महाराष्ट्र आणि सुलतानांचे अत्याचारही संग्रहालयात बघावयास मिळतील. एकूणच दिल्लीत येणार्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा विचार करूनच आम्ही घटनांची निवड केली आहे.
संग्रहालयातील नऊ गॅलरीज कोणत्या आहेत?
महाराष्ट्रात पूर्वी समृद्धी किती होती आणि सुलतानांच्या राजवटीत तिचा कसा अंत झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होईपर्यंत महाराष्ट्र कशा अवस्थेत होता, हे समजल्याशिवाय हिंदवी स्वराज्याचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यासाठी ते दाखविणारी एक थ्रीडी फिल्म पर्यटकांना बघावयास मिळणार आहे. त्यानंतर शस्त्रास्त्रांचे एक भव्य दालन आहे.
गडकिल्ले हे तर स्वराज्याचे वैशिष्ट्य. उत्तरेत डोंगरी किल्ले नाहीतच. त्यामुळे रायगडाची प्रतिकृती पर्यटकांना बघावयास मिळणार आहे. महाराजांचे शौर्य दाखविणारी शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याची घटना, त्यानंतर ‘डिप्लोमसी’ दाखविणारा आग्र्यास जाणे व तेथून सुटका करून घेण्याचा प्रसंग तर उत्तर भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे; तोदेखील संग्रहालयात फिल्मच्या रुपात आहे.
महाराजांनी आरमार उभारून भारतीय नौदलाचा पायाच एकप्रकारे रचला होता. त्यामुळे स्वराज्याच्या आरमाराने खांदेरी -उंदेरीसारखे गाजवलेले पराक्रम येथे बघायला मिळणार आहेत. सुरतेची लूट करून औरंगजेबाचा उतरवलेला नक्षा हा प्रसंगदेखील संग्रहालयात दाखविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अफझलखानवधाचाही प्रसंग घेतला आहे.
संग्रहालयामध्ये कोणकोणच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण प्रयोग केला आहे?
संग्रहालयाचे वैशिष्ट्य ठरणार आहे, ती ‘डार्क राईड.’ शिवचरित्रातील अनेक प्रसंग ‘डार्क राईड’द्वारे पर्यटकांना बघायला मिळणार आहेत. ‘डार्क राईड’ म्हणजे गाडीच्या सफरीद्वारे विविध प्रसंग दाखविणे. या संग्रहालयात असे विविध नऊ प्रसंग 25 मिनिटांच्या ‘डार्क राईड’द्वारे दाखविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मॅपिंग, थ्रीडी, थ्रीडी थिएटर, मोशल सिम्युलेटर्स, मिनिएचर मॉडेल्स, लायटिंग हे आणि असे जगभरात वापरले जाणारे तंत्रज्ञान आम्ही येथे वापरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय उभारताना जगातील उपलब्ध आणि सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरण्याचे आमचे धोरण आहे.
उत्तर भारतही समजून घेणार शिवचरित्र
ट्रस्टची स्थापना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कल्पनेनुसार झाली होती. देशभरात शिवचरित्राचे विविध पैलू पोहोचविणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यानुसार 1981 सालापासून ट्रस्ट विविध माध्यमांतून तो उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. आम्ही प्रामुख्याने दिल्लीमध्ये शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहोत. त्यामध्ये दिल्लीतील शाळांशी समन्वय साधून त्यांना शिवचरित्र सांगणे, त्यासाठी विविध स्पर्धा घेणे, उपक्रम आयोजित करणे असे काम करण्यात येते. मात्र, तरीदेखील शिवचरित्र आणखी प्रभावीपणे मांडण्यासाठी काय करता येईल, असा विचार नेहमी मनात येत होता. त्यानंतर आंबेगाव येथील शिवसृष्टी पाहण्याचा योग आला. ती पाहिल्यानंतर दिल्लीतही असेच काहीतरी भव्य उभारावे, असे मनात आले. त्यानुसार ‘गार्डियन मीडिया’शी संपर्क साधला आणि दिल्लीमध्येही शिवचरित्रसृष्टी साकारण्याचे आमचे स्वप्न आता पूर्ण होत आहे.
- कर्नल (नि.) मोहन काकतीकर, सरचिटणीस - ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’