मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chinmay Krishna Das Bail) बांगलादेशात इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी बांगलादेश उच्च न्यायालयाने बुधवार, दि. ३० एप्रिल रोजी मोठा निकाल दिला. ५ महिन्यानंतर अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती मोहम्मद अतोअर रहमान आणि न्यायमूर्ती मोहम्मद अली रेझा यांच्या खंडपीठाद्वारे हा आदेश देण्यात आला. बांगलादेशस्थित द डेली स्टारच्या वृत्तानुसार सदर बाब उघडकीस आली.
चिन्मय कृष्ण दास यांना गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी ढाका विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा तसेच देशद्रोहाचाही आरोप होता. दि. २ जानेवारी रोजी चितगाव येथील कनिष्ठ न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात बांगलादेश उच्च न्यायालयाने सरकारला दास यांना जामीन का देऊ नये हे स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्यानंतर चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीनावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धर्माचा विजय!
बांगलादेशातील सनातनी समुदायासोबत होणाऱ्या गैरवर्तनाविरोधात आवाज उठवल्यामुळे इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांचा सरकारकडून अतोनात छळ करण्यात आला. अखेर त्यांची निर्दोष सुटका झाली. हा असत्यावर सत्याचा विजय आहे. अशा कठीण काळात आपल्या भक्ताचे रक्षण केल्याबद्दल श्रीकृष्णाचे आभार. हा धर्माचा विजय आहे.
- सुवेंदु अधिकारी, विरोधी पक्षनेते पश्चिम बंगाल विधानसभा