आजचा दिवस ऐतिहासिक! जातिनिहाय जनगणनेमुळे सामाजिक असमतोल दूर होईल! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
30-Apr-2025
Total Views |
नागपूर : आजचा दिवस ऐतिहासिक असून जातिनिहाय जनगणनेमुळे सामाजिक असमतोल दूर होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, ३० एप्रिल रोजी दिली. केंद्र सरकारने आगामी जनगणनेमध्येच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सगळीकडे स्वागत होत आहे.
याबद्दल बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आज देशाकरिता सुवर्णदिवस आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला असून हा ऐतिहासिक दिवस आहे. सात दशकापासून जातिनिहाय जनगणनेची मागणी होती. या निर्णयामुळे एससी, एसटी आणि इतर जातीसुद्धा जनगणनेत सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला असून यासाठी वेगवेगळ्या राज्यांतून मोठ्या प्रमाणात निवदने आली होती. ज्या ज्या समाजांनी आरक्षणासाठी आंदोलन केले त्यावेळी जातिनिहाय जनगणना करा, हीच प्रत्येकाची मागणी होती. सर्वसामान्य जनतेची मागणी आज पूर्ण झाली आहे."
"काँग्रेस पक्षाने कधीही जातिनिहाय जनगणनेचा विचार केला नाही. ६५ वर्षे सरकारमध्ये असूनही कधीही या विषयाला काँग्रेसने थारा दिला नाही. हा विषय त्यांनी फेटाळून लावला. पण आज मोदीजींनी हा निर्णय घेतला असून मी त्यांचे आभार मानतो. एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षणाचा वाटा ठरलेला आहे. पण काही समाजापर्यंत अजूनही सरकार पोहोचले नाही. आता जातिनिहाय जनगणनेमुळे सामाजिक असमतोल दूर होईल," असेही ते म्हणाले.