"पाक हे दहशतवादी..."; संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल

29 Apr 2025 14:07:35
 
india criticizes pakistan at un over terrorism confession
 
नवी दिल्ली : (India Criticizes Pakistan at UN) पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून जगभरात पाकिस्तानला लक्ष्य केलं जात आहे. भारतातून या हल्ल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी भारतीयांकडून केली जात आहे. या हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवादाला पोसत आहे, अश्या आशयाचे वक्तव्य केले होते. याची क्लिप भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पुरावा म्हणून म्हणून सादर करत पाकिस्तानवर तोफ डागली आहे.
 
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी व्हिक्टिम्स ऑफ टेररिजम असोसिएशन नेटवर्क अर्थात VOTAN या संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमासंदर्भातील बैठकीत पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. योजना पटेल यांनी यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकत्याच केलेल्या एका जाहीर विधानाचा संदर्भ घेत पाकिस्तानला सुनावले."पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी 'दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देण्याचा पाकिस्तानचा इतिहास राहिला आहे', असे जाहीर मुलाखतीदरम्यान कबुली दिली आहे.
 
जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा...
 
पुढे बोलताना "ख्वाजा आसिफ यांचा हा उघड कबुलीजबाब ऐकून कुणालाही आश्चर्य वाटलं नाही. यातून पाकिस्तानची प्रतिमा जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि भारतीय उपखंडात अस्थैर्य निर्माण करणारे दुष्ट राष्ट्र म्हणून अधिक स्पष्ट झाली आहे. जग याकडे आता दुर्लक्ष करू शकत नाही", असं योजना पटेल म्हणाल्या.
 
Powered By Sangraha 9.0