पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निशिकांत दुबेंच्या वक्तव्याने खळबळ

28 Apr 2025 22:46:53
Nishikant Dubey Statement on Pakistani Women Marriage
Nishikant Dubey Statement on Pakistani Women Marriage 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत सुरक्षा यंत्रणा सातत्याने पाकिस्तानी तसेच बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांच्या देशात परत पाठवत आहेत. याच क्रमवारीत आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे. पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली लग्न करून भारतात राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निशिकांत दुबे यांनी आपल्या एका एक्स पोस्टद्वारे हा दावा केला असून आजपर्यंत या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही. दहशतवादाचा हा नवा चेहरा समोर आला आहे. आता देशात घुसलेल्या या शत्रूंशी लढायचे कसे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, भारत सरकारने असा कायदा ताबडतोब आणावा की जर कोणत्याही भारतीय नागरिकाने पाकिस्तान किंवा बांगलादेशच्या नागरिकाशी लग्न केले तर त्याचे भारतीय नागरिकत्व तात्काळ संपुष्टात आणले जावे. असे विवाह अनेकदा राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करतात.

उल्लेखनीय म्हणजे २९ एप्रिलपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांनी भारत न सोडल्यास त्यांना अटक करण्यात येईल, असा आदेश भारत सरकारने दिला आहे. या सर्वांना ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागणार आहे. नुकताच इंटेलिजन्स ब्युरोने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला एक अहवाल सादर केला होता, ज्यानुसार, एकट्या दिल्लीत ५ हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे उघडकीस आले होते.

Powered By Sangraha 9.0