मुंबई : दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे जनतेला चांगलेच समजले आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे. वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेल्या विधानाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं डोकं ठिकाण्यावर आहे की, नाही? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला पती, भाऊ तर कुणी आपला बाप गमावला आहे. संपूर्ण देशच नाही तर जगाला याचं दुःख वाटतंय. ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले ते रडून आपबिती सांगत आहेत. हा दहशतवादी हल्ला हिंदूंचा नरसंहार होता हे स्पष्ट होतंय. पण काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारत आहेत. काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याची क्रुरचेष्टा करत आहेत," अशी टीका त्यांनी केली.
हे वाचलंत का? - काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? वडेट्टीवारांच्या विधानावर मंत्री बावनकुळेंचा सवाल
दहशतवाद्यांचा पुळका का?
"दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे जनतेला देखील चांगलंच समजलं आहे. राहुल गांधींपासून ते आज वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना त्या दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय? जनता तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा," असेही चित्रा वाघ म्हणाल्या.