पुणे : सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, २५ एप्रिल रोजी दिली.
पुण्यातील कुटुंब कल्याण भवन येथे राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत राज्यातील नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या लोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू रंगा नायक यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हे वाचलंत का? - "हे राजकारण करण्याचे दिवस नाही तर..."; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत आणि नवीन ४३ आपला दवाखान्यांच्या माध्यमातून नव्याने भर पडणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट, सक्षम आणि गतिमान होईल."
रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार!
ते पुढे म्हणाले की, "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गरोदर महिलेला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठीची प्रणाली आणि कठोर नियम सर्व रुग्णालयांना लागू करण्यासाठी राज्य शासन लवकरच एक नवे धोरण राज्यात लागू करणार आहे. या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणार नाही. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयांसाठी ‘नो डिनायल पॉलिसी’ लागू करणार आहे," असेही त्यांनी सांगितले.