प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास आवश्यक

24 Apr 2025 16:29:25


pankaja munde
 
 
मुंबई,(Pankaja Munde): “पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
 
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने दि. २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई येथील ‘पवई तलाव स्वच्छता व संवर्धन अभियाना’च्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन गणेश घाट पवई येथे करण्यात आले होते.
 
यावेळी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अध्यक्ष सिद्धेश कदम, आ. दिलीप लांडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, ‘महाराष्ट्र प्रदूषण मंडळा’चे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, महानगरपालिका उपायुक्तसंतोष दौड आदी उपस्थित होते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “पर्यावरण रक्षणात कर्तव्य आणि हक्क या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. निसर्ग संवर्धनासाठी शासनासोबत लोकसहभाग आवश्यक आहे. ”
 
निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करणार
“जलयुक्त शिवार योजना’, ‘लेक माझी भाग्यश्री’ अशा योजनांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘जलयुक्त शिवार योजने’तून ग्रामीण विभागात पाणी टंचाईवर मात करण्यात यश मिळाले, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन पर्यावरण विभाग निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करेल. पवई तलावाची स्वच्छता ही या चळवळीची सुरुवात आहे,” असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
 
या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रात हे ‘पर्यावरण संवर्धन अभियान’ राबवण्यात येणार आहे. दि. २२ एप्रिलपासून दि. १ मे पर्यंतच्या नऊ दिवसाच्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ या अभियानाचा शुभारंभयावेळी करण्यात आला. त्यानिमित्त ‘पवई तलाव स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. यावेळी राज्याचे फूलझाड ताम्हण रोपाचे मंत्री मुंडे यांच्या हस्ते रोपण करण्यात आले.
 
घोषवाक्यावर आधारित स्पर्धा
स्थानिक स्वराज संस्थांनी पुढाकार घेऊन नैसर्गिक जलस्रोतांची स्वच्छता, ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल’ यावर आधारित शाळा, महाविद्यालयात नवीन प्रयोगांची स्पर्धा, ‘पर्यावरण बचाओ, वसुंधरा सजाओ’ याप्रमाणेच घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी दि. १ मे रोजी करावा, असे आवाहन या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0